बीटी बियाणे न विकण्याचा बियाणे कंपन्यांचा इशारा

बीटी बियाणे न विकण्याचा बियाणे कंपन्यांचा इशारा
बीटी बियाणे न विकण्याचा बियाणे कंपन्यांचा इशारा

नागपूर ः बीजी-२ तंत्रज्ञानाप्रती गुलाबी बोंड अळीमध्ये प्रतिकारशक्‍ती निर्माण झाली. परिणामी महाराष्ट्रात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. यासंदर्भाने उद्‌भविलेल्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णपणे मोन्सॅन्टोने न स्वीकारल्यास येत्या हंगामात बियाणे कंपन्या बीटी वाणांची विक्री करणार नाहीत, असा इशारा नॅशनल सीड असोसिएशनने महिको-मोन्सॅन्टोला दिला आहे. जानेवारी २०१८ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर देशात बियाणे टंचाई उद्‌भविल्यास त्यालाही मोन्सॅन्टोच जबाबदार राहील, असेही असोसिएशनच्या पत्रात म्हटले आहे.  दृष्टिक्षेपात

  • ४९ रुपये प्रति पाकीट रॉयल्टी मोन्सॅन्टोकडून आकारली जाते.
  • यातील एक रुपयाही डीलर किंवा बियाणे कंपन्यांना मिळत नाही.
  • परिणामी तंत्रज्ञान अपयशाला मोन्सॅन्टोच जबाबदार- कंपन्यांचा दावा.
  • परंतु मोन्सॅन्टो यातील कोणतीही जबाबदारी उचलण्यास तयार नाही.
  • जानेवारी २०१८ पासून बियाणे कंपन्या बीटी वाण विकणार नाही.
  • देशात बियाणे तुटवडा निर्माण झाल्यास मोन्सॅन्टोची जबाबदारी.
  • राज्यात यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याविषयीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभाग व आपल्या भागातील लोकप्रतिनिधींकडे केल्या. त्याआधारे कृषी विभागाने बियाणे कंपन्यांना नोटिसा बजावत भरपाई देण्यास सांगितले आहे. या नोटिसांना कंपन्यांनी उत्तर दिले आहे. त्यामध्ये हा बियाणे दोष नसून  बीजी-२ तंत्रज्ञानामध्ये बोंडअळीला प्रतिकारकशक्‍ती निर्माण झाली. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही केवळ उत्पन्न कमविण्याच्या भावनेतून तंत्रज्ञानपुरवठादार मोन्सॅटो हे बीजी-२ तंत्रज्ञानात गुलाबी बोंडअळीला प्रतिकारशक्‍ती निर्माण झाल्याचे जाहीर करायला तयार नाही, असाही आरोप पत्रातून करण्यात आला आहे.  बीजी-१ तंत्रज्ञानात २००७ मध्येच किडीला प्रतिकारशक्‍ती तयार झाली होती. त्यावेळी मोन्सॅटोने जीईएसीकडे जात तसे जाहीर केले आणि बीजी-२ तंत्रज्ञानाचा प्रसार केला. बीजी-१ आणि बीजी-२ अशा दोन्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक रॉयल्टी मिळविता यावी याकरीता हे करण्यात आल्याचा आरोपही नॅशनल सीड असोसिएशनने केला आहे. परंतु बीजी-२ तंत्रज्ञान गुलाबी बोंडअळीला बळी पडले असतानाही जीईएसीकडे जाण्याची तसदी मोन्सॅटोकडून घेतली गेली नाही. बीटी तंत्रज्ञान केवळ मॉन्सॅटोकडे असल्याने एकाधिकार दाखवित अशा प्रकारची हुकूमशाही भूमिका घेण्यात आल्याचेदेखील एन.एस.ए.आय.ने पत्रात नमूद केले आहे. 

    रिफ्युजीया इन बॅंगचे प्रमोशन का नाही? नॉनबीटी बियाणे शेतात लावले नाही; म्हणून बोंडअळी वाढली, असा दावा मोन्सॅटो करते. हा दावा काही अंशी खरा असला तरी या पार्श्‍वभूमीवर आर.आय.बी. (रिफ्युजीया इन बॅग) म्हणजे बियाण्यातच नॉन बीटी बियाणे मिसळून त्याच्या विक्रीकरीता पाठपुरावा मोन्सॅटोने करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याऐवजी बियाणे कंपन्यांनी ही आपली जबाबदारी समजत आर.आय.बी.करीता प्रयत्न केले आणि त्याला मान्यताही मिळवून घेतली. पण त्यानंतरही या संदर्भाने जाणीवजागृतीचे अपेक्षित प्रयत्न मोन्सॅटोकडून झाले नाही, असेही एन.एस.ए.आय.ने म्हटले आहे.  नॅशनल सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक डॉ. कल्याण गोस्वामी यांनी हे पत्र दिले आहे; त्यानुसार बोलगार्ड-२ तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला बळी पडत असल्याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने २०१५ मध्येच दिला होता. त्याची दखल घेत १९ सप्टेंबर २०१५ आणि २५ ऑक्‍टोंबर २०१७ या तारखांना केंद्रीय कृषी मंत्रालयाने या विषयावर बैठकादेखील घेतल्या. या दोन्ही बैठकांच्या इतिवृत्तातदेखील बीजी-२ तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला बळी पडत असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com