सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर येथील जय शिवराय स्वयंसहायता बचत गटाने परिसरातील शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचा धवल मार्ग दाखवला आहे. यंदा शेतकरी कंपनीची स्थापना करून गटाने पुढील पाऊल टाकले आहे. तीन वर्षांत दीडशे टनांपासून ते ३४० टनांपर्यंत असा सोयाबीन व हरभरा बियाणे उत्पादन, विक्री व उलाढालीचा आलेख उंचावता ठेवला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाक्यापासून तीन किलोमीटर आत उरुण- इस्लामपूर गाव लागते. ऊस पिकाचा हा हुकमी व समृद्ध पट्टा. सोयाबीन, भुईमूग, ऊस ही या भागांतील मुख्य पिके आहेत. गावातील दिग्विजय विलास पाटील हे ‘एमएस्सी ॲग्री’ झालेला तरुण. घरची सहा एकर जमीन. नोकरीच्या मागे न लागता प्रयोगशील शेती करण्याकडेच त्यांचा सुरवातीपासून कल होता. गावातील काही शेतकऱ्यांना एकत्र करून जय शिवराय शेतकरी स्वयंसहायता बचत गटाची स्थापना त्यांच्या पुढाकारातून झाली. ते एका राजकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. समाजसेवा म्हणून परिसरातील अनेक गरजू व्यक्तींना रूग्णसेवेचा लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले. बीजोत्पादनाचा मार्ग बीजोत्पादन ही संकल्पना गटातील सदस्यांच्या चर्चेतून पुढे आली. ती यशस्वी राबवण्यास सुरवात झाली. गटातर्फे सोयाबीन, हरभरा, गहू, भात आदींचे फाउंडेशन, प्रमाणित बियाणे तयार केले जाते. कृषी विद्यापीठ वा संशोधन केंद्रातून पैदासकार (ब्रीडर) बियाणे आणले जाते. विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लागवड व्यवस्थापन केले जाते. गटाने यंदा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पुढचे पाऊल टाकले आहे. विकास सोसायटी, शेतकरी मेळावे याद्वारे गटाच्या बियाण्याचे मार्केटिंग व विक्री केली जाते. गावातील विविध विक्री केंद्रात बियाणे विक्रीसाठीही ठेवण्यात येते. पूर्वी बीजोत्पादनाचे प्लॉट घेतल्यानंतर क्लिनिंग व ग्रेडिंग बाहेरुन करावे लागायचे. त्यासाठी वाहतूक व अन्य खर्च जादा यायचा. स्वतःचे युनिट आता कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धात्मक कृषी विकास योजनेमार्फत क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट घेतले आहे. सुमारे ५०० टन गोदामाची जागाही भाडेतत्त्वावर घेतली आहे. यासाठी एकूण २० लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्यात ५० टक्के अनुदान तर उर्वरित रक्कम गटातील शेतकऱ्यांकडून भागभांडवल स्वरूपात संकलित केली. या युनिटमुळे सुमारे २० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. गटातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये तर अन्य शेतकऱ्यांना २३० रुपये प्रोसेसिंग फी आकारली जाते. असे आहे कंपनीचे नेटवर्क
गटाने उत्पादित केलेले बियाणे वाळवा तालुक्यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उसात आंतरपीक म्हणून हे पीक घेण्यात येते. केडीएस ३४४, फुले, संगम ७२६, जे एस ३३५ या वाणांचे, हरभऱ्यामध्ये दिग्विजय, गव्हात केदार, लोकवन या वाणांचे बीजोत्पादन घेतले जाते. मागील तीन वर्षांतील बीजोत्पादन (सोयाबीन व हरभरा)
प्रतिक्रिया बीजोत्पादन कार्यक्रमामुळे सोयाबीन, हरभरा या पिकांना चांगले दर मिळणे शक्य झाले आहे. -श्रीकृष्ण हसबनीस गट वा कंपनीमार्फत आम्हा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शाश्वत बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. -विश्वासराव पाटील शेतकऱ्यांची बाजारपेठेतील लूट थांबावी, त्यांच्या गाठीस चार पैसे राहावेत यासाठी त्यांना शेतकरी कंपनीमार्फत खात्रीशीर बियाण्यांचा पुरवठा करतो आहोत. आता भाजीपाला निर्यातदेखील आम्ही सुरू केली आहे. यात केळी व विशिष्ट प्रकारच्या मिरचीचा समावेश आहे. -दिग्विजय पाटील, अध्यक्ष, जय शिवराय शेतकरी उत्पादक कंपनी संपर्क- ८९९९३१७५८६ कंपनीचे भविष्यातील नियोजन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.