औरंगाबाद : येत्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पेरणी क्षेत्रासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून ६ लाख ४७ हजार क्विंटल विविध पिकांच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. याची पूर्तता खासगी कंपन्यांकडील ४ लाख ७८ हजार तर महाबीजकडील १ लाख ६९ हजार क्विंटलच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात येत्या खरिपात ५१ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ७ लाख २० हजार, जालना जिल्ह्यातील ६ लाख ०९ हजार, बीड जिल्ह्यातील ७ लाख ५५ हजार, लातूर जिल्ह्यातील ६ लाख २६ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ लाख ६८ हजार, नांदेड जिल्ह्यातील ९ लाख १ हजार, परभणी जिल्ह्यातील ६ लाख १२ हजार तर हिंगोली जिल्ह्यातील ४ लाख ३० हजार हेक्टरचा समावेश आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रानुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत प्रत्येकी ४९ हजार, बीड जिल्ह्यात ६० हजार, लातूर जिल्ह्यात १ लाख ११ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ हजार, नांदेड जिल्ह्यात १ लाख ५ हजार, परभणी जिल्ह्यात ९८ हजार तर हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारच्या १ लाख १० हजार क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे.
महाबीज व खासगी कंपन्यांकडील आवंटनातून बियाण्यांच्या मागणीची पूर्तता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात महाबीजचे ५ हजार क्विंटल व खासगीतील ४४ हजार क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात महाबीजचे १३ हजार तर खासगीतील ३६ हजार क्विंटल, बीडमध्ये महाबीजचे २८ हजार तर खासगीतील ३२ हजार क्विंटल, लातूरमध्ये महाबीजचे ४९ हजार तर खासगीतील ६२ हजार क्विंटल, उस्मानाबादमध्ये महाबीजचे २७ हजार तर खासगीतील ३८ हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले.
नांदेडमध्ये महाबीजकडील २८ हजार तर खासगीतील ७७ हजार क्विंटल, परभणीत महाबीजकडील १३ हजार तर खासगीतील ८५ हजार क्विंटल तर हिंगोली जिल्ह्यात महाबीजकडील ६ हजार क्विंटल तर खासगीतील १ लाख ४ हजार क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आल्याचे नुकत्याच पार पडलेल्या खरिपाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.