यवतमाळ : कपाशी पिकावर आलेल्या संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोंड अळीने तर आता शेतकऱ्यांसमोर नवे आव्हानच उभे झाले. येत्या हंगामात काय, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र या प्रश्नावर शेतकऱ्यांनीच उत्तर शोधले असून, त्यांनी रेशीम शेतीला पसंती दिली आहे. या हंगामात तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करतात. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न तोकडे आहे. अशातच आता शेती मोठ्या संकटातून जात आहे. पिकांवर होणारा विविध रोग - किडींचा प्रादुर्भाव यानंतर हातात आलेल्या पिकाला मिळणारा कमी भाव ही स्थिती कायम आहे. त्यातच बीटी कापसावर बोंड अळीच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकटच उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आता या चक्रातून बाहेर पडून नवीन प्रयोग सुरू केले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
गतवर्षी जिल्ह्यात २०० एकरांवर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २१३ एकरांवर लागवड झाली. त्यातून ६३ हजार ३५० अंडीपुंजांची निर्मिती करून २७ मेट्रिक टनांचे उत्पादन झाले. पुढील वर्षासाठी २५० एकरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते. मात्र ते आता ५०० एकरांवर गेले. रेशीम शेतीसाठी पहिल्यांदाच एक हजार सात शेतकऱ्यांनी अर्ज सादर केलेत.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यात लक्ष देऊन रेशीम संचालनालयाला उद्दिष्ट वाढवून दिले. शिवाय शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे हे उद्दिष्ट वाढविण्यात यश मिळाले. येत्या काळात आणखी किमान एक हजार अर्ज येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘मनरेगा’मधून मजुरी मिळत असल्याने याला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील वातावरण रेशीमसाठी पोषण असल्याने कापसाला रेशीम पर्याय ठरू शकतो, अशी शक्यता रेशीम संचालयाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आता कपाशीची पर्याय म्हणून रेशीमला पसंती देत असल्याचे चित्र सध्या तरी आकडेवारीवरून दिसून येत आहे.