सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः अनिल घनवट

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास प्रारंभ
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास प्रारंभ

शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. असे असताना आधार देण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देत जातीयवाद पेरून निवडणुका जिंकण्याचा डाव आखत आहेत. पण २०१९ ची निवडणूक ही ‘कृषी धोरण अर्थवादाचे ध्रुवीकरण’ याच मुद्यावर होईल, असे प्रयत्न आपण करणार आहोत. जातीयवादाची पेरणी करण्याचा डाव हाणून पाडू. कृषी धोरणावरच बोलायला लावू, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले.

शिर्डी येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या १४ व्या अधिवेशनाला सोमवारी (ता.१०) संघटनेच्या ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. पंजाबचे शेतकरी नेते व माजी खासदार भूपेद्रसिंग मान, माजी आमदार वामनराव चटप, माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत हंगरगेकर, शेतकरी संघटना ट्रस्टचे कार्याध्यक्ष गोविंदराव जोशी, सीमा नरवडे, अनंतराव देशपांडे, ज्योत्स्ना बहाळे, माजी आमदार सरोज काशीकर, युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गीता खांडेभराड यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या वेळी घनवट म्हणाले, की सध्या सगळ्याच बाजूने शेतकरी संकटात आहे. सरकार मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. येत्या निवडणुकांमध्ये मुद्दा काय असावा, कृषी धोरण काय असावे हे ठरवणार आहोत. कारण शेती आणि शेतकरी याकडे दुर्लक्ष करून सरकार जातीयवाद पेरून २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचा डाव आखत आहे. मात्र हा डाव हाणून पाडू. अर्थवादी प्रश्न विचारू, कृषी धोरण ठरवायला लावू. ध्रुवीकरण अर्थवाद, समाजवाद की स्वातंत्र्यता व देशाचे कृषी धोरण या विषयावर बोलले नाही, तर सभेतून उठून जाऊ, प्रसंगी सभा उधळून लावू. या बाबींचे धोरण अधिवेशनात ठरणार आहे.

दिल्लीत लवकरच काही शेतकरी संघटनांनी दोनशे समाजवादी लोकांना घेऊन आंदोलन केले. त्यांच्या मागण्या सरकारने मागण्या मान्य केल्या, तर शेतकऱ्यांना आधार नव्हे तर संकट येणार आहे. त्यामुळे हे आपल्याला रोखायचे असून, त्यासाठी दिल्लीत धडक मोर्चात काढणार असल्याचे श्री. घनवट यांनी सांगितले.

पंजाबचे शेतकरी नेते व माजी खासदार भूपेद्रसिंग मान म्हणाले, की देशात खूप आत्महत्या झाल्या आहेत. देश शेतकऱ्यांचा असून त्यावर इतर लोकांनी कब्जा केला आहे. त्यावर आपल्याला इलाज करायचा आहे. झालेल्या शेतकरी आत्महत्या वाया जाऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठीचा निर्णय आपल्याला येथे करायचा आहे.

या वेळी सुधीर बिंदू यांनी सूत्रसंचालन केले. अधिवेशनात देशभरातील शेतकरी तसेच भारतीय किसान युनियनचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com