सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे संकट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच पावसाने सतत हुलकावणी दिली. आज साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटत आला, पण अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरी, बोअर, तलाव यांसारख्या कोणत्याही स्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील ११ पैकी १० तालुक्‍यांमध्ये ४५ टक्‍क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असताना, आता ‘हुमणी’ने धुमाकूळ घातल्याने ऊसपट्ट्यातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकूणच जिल्ह्यावर या दोन्ही आपत्तींमुळे दुहेरी संकट ओढावले आहे.

सोलापूर जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असला, तरी खरिपातही बऱ्यापैकी पिके घेतली जातात. गेल्या तीन वर्षांपासून खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आली आहे. ९८ हजार हेक्‍टर पेरणीचे उद्दिष्ट असलेल्या या हंगामात आता अडीच ते तीन लाख हेक्‍टर क्षेत्रापर्यंत पेरणीचे क्षेत्र पोचले आहे. यंदाही जवळपास दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेषतः तूर, सोयाबीन, मूग, मटकी, उडीद या पिकांचा त्यात समावेश होतो. आता मूग, मटकी, उडीद पावसाअभावी वाया गेले आहे. आता सोयाबीन आणि तूर फक्त शिवारात आहे. पण तेही आता करपून चालले आहे.

सोलापूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०० मिमी आहे. या महिन्यात आतापर्यंत ४१६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत फक्त सरासरी १७०.९८ मिमी पाऊस झाला आहे. अवघ्या ४०.६५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या भागात सर्वाधिक परिस्थिती कठीण झाली आहे.

एकीकडे दुष्काळाची ही परिस्थिती असताना, पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, बार्शी आदी भागांत उसावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील शेतकरी वेगळ्याच संकटात अडकले आहेत. जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्‍टर इतके उसाचे क्षेत्र आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यापैकी जवळपास २५ हजार हेक्‍टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येते. कृषी विभागाकडून सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

उजनी भरले तरीही... पुण्याच्या पाण्यावर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले असले, तरी या धरणाचा फायदा माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा, मोहोळ या मोजक्‍याच तालुक्‍यांना होतो. उर्वरित तालुक्‍यांत पाण्यासाठी वणवण अजूनही कायम आहे. त्यात आता दुष्काळामुळे तर फारच अडचण झाली आहे. त्यामुळे धरण भरलेले असूनही या पाण्याचा उपयोग सरसकट जिल्ह्याला होत नाही.   प्रशासनाच्या हालचाली

  • जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव
  • जिल्ह्याच्या ४० टक्के भागात पाणीटंचाई शक्‍यता
  • ऑक्‍टोबर ते डिसेंबरपर्यंतचा टंचाई आराखडा होणार तयार
  • टॅंकर ऐवजी विहीर, बोअर अधिग्रहणावर भर
  • पूरक पाणीपुरवठा योजनांचेही करणार अधिग्रहण    
  • दीड कोटीचा आराखडा तयार होण्याची शक्‍यता
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com