सातारा ः शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने सरकारने धोरणे आखावीत, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला अाहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे कशी जगवायची, याचा विचार करावा लागेल. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील ज्ञानसंपदेचा मार्ग सुरू राहावा यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मुले इथे आणली अाहेत. या उपक्रमातून ही उपेक्षित मुले आम्ही शिकवून त्यांना उभे करणार अाहोत, असे त्यांनी सांगितले.
सातारा येथे बुधवारी (ता.४) रयत शिक्षण संस्थेच्या ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलपती आमदार पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य दिलीप वळसे पाटील, बाळाराम पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधणे, बबनराव पाचपुते, दादाभाऊ कळमकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, ॲड. भगीरथ शिंदे, डॉ. भाऊसाहेब कराळे, फरोख कुपर, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की आत्महत्या करण्याचे मुख्य कारण कर्जबाजारीपणा हे आहे. आम्ही सत्तेत असताना या दृष्टीने काही निर्णय घेतले होते. तीन लाखांपर्यंत पीककर्जाचे व्याज १२ टक्क्यांचे तीन टक्क्यांवर आणले होते; तसेच त्या वेळच्या राज्य सरकारने वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याची महत्त्वाची कामगिरी केली.
शेतकऱ्यांची निराशा कमी करण्यासाठी आम्ही पावले टाकली असतानासुद्धा काही शेतकरी आत्महत्या करतात; यामुळे कुटुंबे उघडी पडतात. या कुटुंबांतील ज्ञानसंपदेचा मार्ग हा सुरू राहिला पाहिजे. यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या मुलांची जबाबदारी घेण्याचा संस्थेत ठराव घेतला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरवातीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना याच पद्धतीने शिक्षणात आणले. संस्थेच्या या उपक्रमातून ही मुले आम्ही शिकवून त्यांना उभे केल्याशिवाय शांत राहणार नाही. पुढील काळात ही मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत मोठी झालेली पाहावयास मिळतील, अशी अाशा त्यांनी व्यक्त केली.