शेतमालास उत्पादन खर्चापेक्षा अधिक ५० टक्के भाव हवा

शरद पवार
शरद पवार

अमरावती : कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधीच सुटणार नाहीत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्‍के रक्‍कम असा शेतमालाच्या विक्रीपोटी परतावा मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी नांदेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले.  सोमवारी (ता.२३) श्री. पवार यांचा अमरावती शहरात सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी; तर पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी मंत्री अनिल देशमुख, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अनिल बोंडे उपस्थित होते.  श्री. पवार यांनी आपल्या भाषणात अमरावतीशी असलेल्या ऋणानुबंधाचा विशेष उल्लेख केला. राजकीय कारकिर्दीची सुरवात करताना अमरावतीशी अनेकदा संपर्क आला. या वेळी अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या नावांचाही त्यांनी उल्लेख केला. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेवटच्या घटकातील मुलांच्या शिक्षणाचा विचार करून शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. त्यांच्यामुळेच आज अमरावती शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. शेतीची उत्पादकता वाढवायची असल्यास शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व निविष्ठांची उपलब्धता कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या मार्गाने आजच्या सरकारने जाण्याची गरज आहे. उत्पन्न वाढत नाही तोवर शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणे शक्‍य नाही. त्याकरिता कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व त्यावर अधिक ५० टक्‍के याप्रमाणे पैसे मिळण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. 

बारामती येथे संत गाडगेबाबा त्या वेळी आमच्याकडे आले होते. घरात ते थांबत नसत. त्यांनी आमच्याकडील गोठ्यात काही काळ घालविला. त्यांच्यापासूनच सामाजिक जाण माझ्यामध्ये निर्माण झाली. संत गाडगेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसाही अमरावतीला लाभला आहे, त्यामुळे ही पावन भूमी असल्याचे श्री.पवार म्हणाले. 

पवारांचा सल्ला मोलाचा : मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांना मी व चंद्रकांत पाटील भेटलो. त्यांच्या सल्ल्यानुसारच कर्जमाफीची योजना प्रत्यक्षात आणली. समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी त्यासोबतच शरद पवार यांनी विरोध केला; परंतु त्यांना या प्रकल्पातून होणारे फायदे कळाल्यानंतर त्यांचा विरोध आता मावळला आहे. रस्त्यांमुळे राज्याच्या विकासाला हातभार लागतो याची कल्पना श्री. पवार यांना आहे. त्यामुळेच त्यांनी आता याला विरोध करणे सोडले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com