उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर लावावा : शरद पवार

शरद पवार
शरद पवार

कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी ६५ ते ७० टक्‍के साखर मिठाई, औषधे आणि शीतपेयांसाठी वापरण्यात येते. या साखरेवर सेस किंवा कर लावून ती रक्‍कम साखर कारखान्यांमार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी. साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणारा खर्च, तसेच व्याज शासनाने द्यावे. अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली होती. त्या वेळी आपण मंत्री असताना यातील काही निर्णय घेतले होते, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.  ते म्हणाले, ‘‘साखर दर घसरणीने उद्योग खूपच अडचणीत आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. यातून तातडीने मार्ग निघणे आवश्‍यक आहे. संपूर्ण भारतात साखरेचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यातच साखरेचे भाव पडले आहेत.  त्यामुळे सध्या साखर उद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थामंत्री विलास पासवान व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांचा समावेश आहे. या समितीला आपण तीन सूचना केल्या आहेत. निर्यात करण्यासाठी वाहतूक खर्चात सवलत द्यावी, इथेनॉलचे भाव वाढवावेत, साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणाऱ्या खर्चासाठी केंद्राने आर्थिक मदत करावी, असे सांगितले आहे. श्री. पवार म्हणाले, की केंद्र सरकारबद्दल देशभरात नाराजीचा सूर आहे. सरकारच्या धोरणामुळे सर्व घटकांत अस्वस्थता आहे. सर्वत्र मंदीचे संकट आहे. उत्पादक संकटात आहे, सामान्य माणूस संकटात आहे. गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत चालले आहे. हे चित्र चांगले नाही. यातून शेतकरीही सुटलेला नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. सरकारबद्दलची उद्विग्नता, संताप शेतकरी आत्महत्या करताना चिठ्ठीवर नावे लिहून व्यक्‍त करत आहेत. हे चित्र नक्कीच चांगले नाही.  भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे. लोक बदलाला इच्छुक आहेत, मात्र आम्ही एकत्र राहू की नाही, याबद्दल लोकांमध्ये काळजी आहे. त्यामुळे आपण भाजपच्या विरोधात सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रथम राष्ट्रवादी व काँग्रेस महाराष्ट्रात एकत्र येऊन आमच्या फुटीचा फायदा भाजपला होणार नाही याची काळजी घेत असल्याचे श्री. पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.  सरकारने मदत करणे आवश्यक सध्या साखर उद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री विलास पासवान व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांचा समावेश आहे. या समितीला आपण तीन सूचना केल्या आहेत. निर्यात करण्यासाठी वाहतूक खर्चात सवलत द्यावी, इथेनॉलचे भाव वाढवावेत, साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणाऱ्या खर्चास केंद्राने आर्थिक मदत करावी असे सांगितले आहे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com