कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू करणार ः पवार

‘रयत’मध्ये शेती क्षेत्राबाबतही काम केले जात आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शेती उपयुक्त अवजारांना पुरस्कार मिळाले आहेत. शेतीशी निगडित असणारा घटक मोठा आहे. संस्थेस अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या विकासाची जबाबदारी आपली आहे. - शरद पवार, अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस अभिवादन करताना शरद पवार
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस अभिवादन करताना शरद पवार

सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर आधारित शिक्षण गरजेचे आहे, म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या या शतकमहोत्सवी वर्षात गरजेवर आधारीत उपक्रम संस्थेत सुरू करण्यात येणार आहेत. नजीकच्या काळात त्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. २२) कर्मवीर समाधी परिसरात आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. कार्यक्रमास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी संस्था सुरू केली. गेली ९९ वर्षे हे कार्य सुरू आहे. त्यामुळेच आज चार लाख ५८ हजार मुले संस्थेत शिक्षण घेत असून त्यामध्ये ५० टक्के मुली आहेत. शताब्दीचा फक्त सोहळा करायचा नाही तर महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवायचे आहेत. ‘इनोव्हेशन’च्या दृष्टीने कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. आज कौशल्यावर आधारीत शिक्षणाची गरज आहे, म्हणूनच टाटा कन्सलटन्सीची चार केंद्रे संस्थेत उभारण्यात येणार आहेत.

उद्योगांपासून ते शेतीक्षेत्रापर्यंत तसेच कमवा आणि शिका योजनेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्याकाळी व्यक्त केलेले विचार आणि राबविलेली धोरणेच आता नव्या रुपात मांडली जात आहेत, असे सांगून डॉ. करमळकर म्हणाले, की आजही ७७ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. या वेळी डॉ. विजयसिंह सावंत यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com