एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नाराजी

बियाणे
बियाणे

नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच.टी. बीटीसंदर्भातील समिती आपला अहवाल या महिन्याच्या अखेरीस सोपविण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर समितीचे प्रमुख पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी गेल्या पंधरवाड्यात गुणनियंत्रन निरीक्षकांची मुंबईत बैठक घेतली होती. विशेष म्हणजे या अहवालात पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले.  कापसावर बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव, बोंड अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणाऱ्या ५४ शेतकरी, शेतमजुरांचा फवारणी दरम्यान झालेला मृत्यू आणि हजारांवर बाधित रुग्ण यामुळे शासनाची चिंता वाढली होती. यामागील कारणमीमांसा जाणून घेतली असता राज्यभरात अनधिकृत एच. टी. कपाशी लागवड क्षेत्र वाढीस लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. फवारणी बाधित आणि मृतांची संख्या सर्वाधीक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात तर एच. टी. बिटीचा अनधिकृत पेरा सर्वाधिक असल्याचाही धक्‍कादायक खुलासा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पाहणीत झाला होता. याची दखल घेत शासनाने एच. टी. बीजोत्पादन कसे होते, अशा अनधिकृत क्षेत्राला तांत्रिक सहकार्य करणारे कोण? त्यासोबतच बियाणे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचते या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वात विशेष चौकशी पथकाचे गठन केले होते.  अमरावती विभगीाय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे या समितीचे सचिव आहेत. दरम्यान एच. टी. सीडसंदर्भातील या एस.आय.टी.ने भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.) चे दिल्ली  मुख्यालयात  जात तेथे देखील चौकशी केल्याची माहिती आहे. 

केंद्रीय कापूस संशोधन संस्था अडचणीत नागपूरातील एका खासगी कंपनीच्या बियाण्यात एच.टी. जनुक आढळल्याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दिला होता. त्यानंतर त्याच संस्थेने दुसऱ्याच दिवशी हा अहवाल फिरविला. त्यामुळे कंपनी आणि सीआयसीआर दोघेही सशंयांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ‘सीआयसीआर’च्या या दुहेरी भूमिकेवर कारवाईची मागणी कृषी विभागाने आयसीएआरकडे केली आहे. त्यातच कृषी विभागाने पहिल्या अहवालाच्या आधारे कंपनीविरोधात मलकापूर पोलिसात तक्रार दिली होती. परंतु दुसऱ्या अहवालात कंपनीला सीआयसीआरने क्लीन चिट दिल्याने आपल्यावरील गुन्हा रद्द ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका कंपनीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. 

पोलिस विभाग ठरला अकार्यक्षम राज्यात एच.टी. बियाण्यांच्या झालेल्या कारवायांपैकी सर्वाधिक १७ कारवाया अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत त्यातील ११ कारवाया एकट्या यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. या सर्वच प्रकरणात पोलिस तक्रारी करण्यात आल्या. आरोपी निष्पन्न झाले; पोलिसांनी मात्र खाबुगिरीआड यातील मुख्य आरोपींना संरक्षण दिल्याने एच.टी. पुरवठादारांची साखळी तोडता आली नाही. अहवालात पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह लावण्यात आल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com