कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली पूर्ण

राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा दावा खोटा ठरला असून, राज्य सरकारने जाहीर केलेला ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडाही घटण्याची शक्यता आहे.
साठ टक्के अर्जांची छाननी पूर्ण
साठ टक्के अर्जांची छाननी पूर्ण

मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेच्या छाननीचे साठ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले असून, येत्या आठवड्यात छाननी पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्ज वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सहकार खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

कर्जमाफीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. याकाळात सुमारे ५६ लाख ५८ हजार ३९३ शेतकरी कुटुंबीयांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी २ लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांचे अर्ज आधारलिंक नाहीत. कर्जमाफीसाठी सरकारने अर्जदार शेतकऱ्यासह त्याची पत्नी आणि अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली, त्यामुळे शेतकऱ्यांसोबत त्यांच्या पत्नींचेही अर्ज भरून घेण्यात आले.

पती आणि पत्नी अशी शेतकरी नोंदणी झाली असल्याने ऑनलाइन शेतकरी कुटुंबांच्या अर्जांचा आकडा ५६ लाख ५८ हजारांवर गेला. यांत कर्जदार शेतकरी महिला खातेदारांची संख्या लक्षणीय असून, असे सुमारे दहा लाख खातेधारक वाढून एकूण कर्जदारांची संख्या ६६ लाखांवर जाईल असा अंदाज आहे.

या सर्व अर्जदारांच्या छाननीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, सोमवारअखेर त्यापैकी साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात छाननीचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. सध्या राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले सॉफ्टवेअर आणि सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांकडून अशा द्विस्तरावर छाननीचे हे काम केले जात आहे.

तसेच, सहकार विभागाने बँकांकडूनही शेतकरी कर्जाबद्दलची माहिती मागवली होती. ६६ रकान्यांचा अर्ज बँकांकडून भरून घेतला जात आहे. ही माहितीसुद्धा येत्या आठवड्याभरात सहकार खात्याला प्राप्त होईल, असे सांगण्यात आले. या दोन्ही माहितींची खातरजमा करून ऑक्टोबरच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात कर्ज वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज आहे.

... तर बँकांवर कारवाईचे अस्त्र कर्जमाफीमध्ये सुमारे १५ ते १७ लाख खातेदारांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात सहकार खात्याने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यावरून बँकांवर कारवाईचे अस्त्र उगारले जाण्याची शक्यता आहे. ‘अॅग्रोवन’ने गेल्याच आठवड्यात अशा बनावट खातेधारकांच्या अनुषंगाने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा दावा खोटा ठरला असून, त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेला ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडाही घटण्याची शक्यता आहे. दावा खोटा, कर्जमाफीचा आकडाही घटणार राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने राज्यात ८९ लाख कर्जदार असल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात, कर्जमाफीसाठी पुरुष आणि महिला शेतकऱ्यांचे ६६ लाख खातेदारांचे अर्ज आले आहेत. नोकरदार शेतकरी असलेल्या सुमारे सहा लाख कर्जदारांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले नाहीत. अशी एकंदर ७२ लाख खातेदारांची माहिती पुढे आली आहे.

मात्र, उर्वरित सुमारे १५ ते १७ लाख खातेदारांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा दावा खोटा ठरला असून, राज्य सरकारने जाहीर केलेला ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडाही घटण्याची शक्यता आहे. हे शेतकरी नेमके कोण? कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरातील कर्जदारांची संख्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मुंबईतील २३ हजार ४९४ आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील १ हजार ५०३ इतक्या कर्जदारांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे हे शेतकरी नेमके कोण, अशी चर्चा रंगली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com