सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही कारखान्यांनी दिली संपूर्ण एफआरपी

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही कारखान्यांनी दिली संपूर्ण एफआरपी
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही कारखान्यांनी दिली संपूर्ण एफआरपी

कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी करण्यात येत असतानाच बुधवारी (ता. १३) सायंकाळी दक्षिण महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी नाट्यमय भूमिका घेतली पूर्ण एक रकमी एफआरपी उत्पादकांच्या नावावर जमा करून उत्पादकांना अनपेक्षित सुखद धक्का दिला.  सांगलीतील दत्त इंडिया, विश्‍वास, निनाईदेवी या कारखान्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा कारखान्याने एफआरपीची रक्कम पूर्ण बुधवारी सायंकाळी उत्पादकांच्या खात्यात अदा केल्याने साखरेची देवघेव होण्याचा मार्ग निकालात निघण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम जमा करण्यात फारशा चर्चेत नसलेल्या किंवा आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसलेल्या कारखान्यांनीच पुढाकार घेतला आहे.  नामवंत कारखान्यांनी मात्र अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी आता या कारखान्यांना पूर्ण रक्कम द्यावीच लागणार असल्याने येत्या काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात निश्‍चितपणे जमा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. इतर कारखान्यांनी रक्कम जमा करण्यास पुढाकार घेतल्याने आता बडे कारखानेही आपली भूमिका तातडीने जाहीर करतील असा अंदाज साखर पट्ट्यात आहे.  दक्षिण महाराष्ट्रातील उसाचे प्रमुख केंद्र कोल्हापूर जिल्हा असल्याने कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या की मार्ग काढण्यासाठी कोल्हापुरातील कारखान्यांकडे राज्यातील साखर कारखानदारींचे लक्ष असते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव व मातब्बर कारखानदार यामुळे येथे मार्ग निघाला की राज्यभरात त्याची अंमलबजावणी कारखानदारांमार्फत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून एफआरपीचा मुद्दा साखर पट्ट्यात धूमसत आहे. संघटनेने केलेली साखरेची मागणी, त्याला मिळणारा नगण्य प्रतिसाद तरीही संघटनेने केलेली आंदोलनाची तयारी या पार्श्‍वभूमीवर हा प्रश्‍न आणखी तीव्र होईल, अशी शक्‍यता होती. परंतु सांगलीच्या दत्त इंडिया या कंपनीने चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा साखर कारखान्याच्या प्रशानसाने एफआरपीएवढी रक्कम थेट खात्यात जमा करून सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला.  या निमित्ताने या कारखान्याचे नाव पहिल्यांदाच दक्षिण महाराष्ट्रात चर्चेला आले. या पाठोपाठ कोल्हापुरातील पंचगंगा कारखाना चालविण्यास घेतलेल्या रेणुका शुगर्सनेही पहिल्या हत्यातील उर्वरित एफआरपी जमा करण्यास प्राधान्य दिले. कोणत्याही चर्चेविना या कारखान्यांनी थेट रक्कम जमा करण्यास प्राधान्य दिले. सहकार क्षेत्रातील कारखान्यांना या निर्णयामुळे काहीसे आश्‍चर्य वाटले असले तरी, आता या कारखान्यांपुढे अडचणी मांडण्यास कोणतीही संधी एकरकमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांनी न दिलेल्याने आता या कारखान्यांची गोची झाली आहे. परिणामी दर जाहीर न केलेले कारखाने दबावात आले आहेत. आता ज्या कारखान्यांनी उर्वरित रक्कम दिली नाही त्या कारखान्यांवर मोर्चा काढण्याचे नियोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. यामुळे हे कारखाने कोणती भूमिका घेतात यावर यंदाच्या पूर्ण एफआरपीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या सगळ्या खेळात साखर देण्या घेण्याची प्रक्रिया मात्र धूसर होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com