सांगली ः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.
काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी साचून सोयाबीन कूजू लागली आहेत. यामुळे उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४७ हजार ३८५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पाऊस कमी झाल्याने पेरणी कमी झाली होती. मात्र, झालेल्या पावसावर सोयाबीनची पिके चांगली बहरली होती. सोयाबीन पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन सुरू केले होते. मात्र, जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला.
या पावसाने ऊस पिकाला जीवदान मिळाले असले तरी सोयाबीन पिकाला याचा फटका बसला आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीनची काढणी काहीशी पुढे गेली आहे. सोयाबीनची काढणी सुरू असली तरी शेतात पाणी साचून राहिलेले आहे. यामुळे सोयाबीन कुजू लागले आहे.
परिणामी सोयाबीन काढणीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतातील पाणी काढण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. साचलेल्या पाण्यात सोयाबीनची काढणी सुरू आहे.