सोयाबीनमध्ये तेजीचे संकेत
सोयाबीनमध्ये तेजीचे संकेत

सोयाबीनमध्ये तेजीचे संकेत

पुणे : राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, पुढील दोन महिन्यांत भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनेची सांगता आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचा पेरा मंदावला असल्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव वधारले आहेत. सध्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनने ३००० रुपये क्विंटलचा टप्पा गाठला असून, आगामी काळात दर सरासरी ३२०० ते ३३०० रुपये राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजाराचा चढता कल लक्षात घेऊन माल विक्रीचा निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

यंदा सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यावर लगेचच दर पडले. केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवर शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यास उशीरच लावला. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळू शकला नाही. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ३०५० रुपये असताना बाजारात मात्र सरासरी २२०० ते २६०० रुपये दर मिळत होता. सरकारने आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरू केले. परंतु जाचक अटींमुळे आणि आर्द्रतेचा निकष बदलण्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांचे आश्वासन हवेतच राहिल्यामुळे अत्यल्प सरकारी खरेदी झाली. सुमारे ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करणे भाग पडले, असे जाणकारांचे निरीक्षण आहे.

मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याची भावांतर योजना लागू केली. या योजनेची मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती, ती नंतर २५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. या निर्णयामुळे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांचा फायदा झाला, परंतु एकाच वेळी बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे दर पडले. त्याचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. मध्य प्रदेशमधील भावांतर योजना समाप्त झाल्यामुळे आवकेचा दबाव कमी झाल्याने सध्या बाजारात दर सुधारले आहेत, असे लातूर येथील व्यापारी नितीन कलंत्री यांनी सांगितले.

``भावांतर योजनेमुळे आवक वाढली, तसेच माल खरेदीची सरकारी यंत्रणा अपुरी पडली. त्यामुळे राज्यात सोयाबीनचे दर गडगडले. अर्जेंटिना हा सोयाबीनचे उत्पादन घेणारा प्रमुख देश आहे. तिथे पेरणी मंदावल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला उठाव मिळाला आहे. त्याचा प्रभाव देशातील सोयाबीनच्या बाजारभावावर पडला आहे. वायदे बाजारातही त्याचे प्रतिबिंब उमटले,`` असे कलंत्री म्हणाले.

शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनीही या निरीक्षणाशी सहमती दाखवली. भावांतर योजनेमुळे फुगलेली आवक कमी झाली आहे, तसेच अर्जेंटिनामध्ये दुष्काळसदृश स्थितीमुळे लागवड घटल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोयाबीनचे दर ३०००- ३१०० रुपये क्विंटल असून त्यात आणखी १०० ते १५० रुपये वाढ होईल, असे ते म्हणाले. त्यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळताच माल विकून टाकावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

वायदे बाजारातही सोयाबीनच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे हजर बाजारातही सोयाबीनचे दर चढेच राहतील, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत, असे मत शेतमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ``एनसीडीएक्सच्या प्लॅटफॉर्मवर मे कॉन्ट्रॅक्ट ३३८६ रुपये क्विंटल या दराने आहे. ३३९० रुपये किंमत पातळीलाही खरेदीदार आहेत. याचा अर्थ सोयाबीनचे दर हजर बाजारातही निश्चित वाढतील. परंतु सध्या व्यापारी शेतकऱ्यांना ३००० च्या वर दर देत नाहीत. शेतकऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी करून नंतर चढ्या भावाने विकून नफेखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी थोडी कळ काढावी आणि दर सुधारल्यावर मालाची विक्री करावी, `` असा सल्ला त्यांनी दिला आहे.

सोयाबीनने ३००० रुपयांचा टप्पा गाठल्यामुळे शेतकऱ्यांनी माल विकायला सुरवात केल्याने आवक वाढली आहे. देशात लातूर ही सोयाबीनची प्रमुख बाजारपेठ असून तिथे सध्या दररोज २० ते २५ हजार क्विंटल आवक होत आहे. दिवाळीसारखा सण आणि रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी पैशाची आवश्यकता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याकडील माल विकून टाकला; परंतु अजूनही ४० टक्के माल शेतकऱ्यांकडे शिल्लक असावा, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया(सोपा)च्या आकडेवारीनुसार यंदा महाराष्ट्रात ३४.४८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून ३१.८९ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी लागवड ३५.८० लाख हेक्टर आणि उत्पादन ३७.४२ लाख टन राहिले.

बाजाराचा कल सध्या राज्यात ३०१० ते ३१०० रुपये क्विंटल दराने सोयाबीनची विक्री सुरू आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याचा ट्रेंड पाहता सोयाबीनचे दर आणखी वाढून ३२०० ते ३५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु ३४००-३५०० दर हा अत्यंत चांगल्या गुणवत्तेच्या मालाला मिळेल. सर्वसाधारणपणे सरासरी ३२०० ते ३३०० रुपये ही भावपातळी आधारभूत धरून शेतकऱ्यांनी माल विक्रीचा निर्णय घेणे योग्य ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी वायदे बाजारातील सोयाबीनचा तेजीचा कल लक्षात घेता राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे, असे मत शेतमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. या कंपन्या गेल्या काही महिन्यांपासून वायदे बाजारातील व्यवहारात उतरल्या आहेत. व्याज आणि कॅरियिंग कॉस्ट विचारात घेतली तरी या कंपन्यांसाठी वायदे बाजारात सोयाबीनच्या आगाऊ विक्रीचे व्यवहार करणे फायदेशीर ठरेल, असे जाधव म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com