जळगाव : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. परंतु, यंदा सोयाबीन पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने उत्पादन घटले आहे. परंतु, काळ्या कसदार जमिनीच्या भागात सोयाबीनची स्थिती बरी आहे.
काढणी जशी सुरू झाली तसे ढगाळ वातावरण आहे. वातावरण खराब होऊन नुकसान होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी काढणीला वेग दिला. यातच मजुरीचे दरही वाढले आहेत. दोन हजार रुपये एकर असे दर सोयाबीन कापणी करणे, तो गोळा करून त्याचा ढीग लावण्यासाठी घेतले जात आहेत.
सोयाबीन मळणीचे दर यंदा १०० रुपये प्रतिक्विंटल असे स्थिर असून, अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन गोळा करणे, कापणे यात वेळ जाईल म्हणून हार्वेस्टरने मळणी करण्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव या तालुक्यांमध्ये सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली होती. जिल्ह्यात जवळपास २९ हजार हेक्टरवर सोयाबीन होता. यातील निम्मा सोयाबीन मळणी होऊन शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. परंतु, निम्म्या सोयाबीनची काढणी अद्याप झालेली नसल्याची माहिती मिळाली.
यंदा सोयाबीन काढणीनंतर मिळणारे कुटारही फारसे येत नसल्याचे चित्र आहे. कुटारचा उपयोग पशुधनासाठी होतो. यातच अनेक ठिकाणी कुटारचा दर्जाही फारसा योग्य नसल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे उत्पादन यंदा काहींना बरे आले आहे, तर काहींना अल्प उत्पादन हाती आले. एकरी दोन ते पाच क्विंटल, असे उत्पादन मिळत आहे. यंदा अनेकांना जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली होती.