जळगाव : जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे येत्या १३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात दोन सोयाबीन खरेदी केंद्रे असून, यात आतापर्यंत फक्त ६५० क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे.
१० नोव्हेंबरनंतर खरेदी केंद्र खऱ्या अर्थाने सुरू झाले. पाचोरा व जळगाव येथे केंद्रे सुरू असून, त्यात सुरवातीला सोयाबीनची आवक अधिक होती. परंतु नंतर दर्जा व इतर मुद्दे सांगून सोयाबीन परत पाठविला जात होता. दिवाळीनंतर महिनाभर दोन हजार ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होते.
शासकीय खरेदी केंद्रात ३०५० रुपये प्रतिक्विंटल दर होता. त्यामुळे शासकीय केंद्रात सोयाबीनची आवक अधिक होती. आर्द्रता, त्यातील कचरा आदी मुद्यांमुळे हा सोयाबीन खरेदी केंद्रातून ग्रेडर परत पाठवीत होते. या प्रकारावरून जळगाव व पाचोरा येथे अनेकदा शेतकरी व खरेदी केंद्रातील कर्मचारी यांच्यात वाद झाले. या वादांच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंतही पोचल्या. परंतु त्यांची दखल घेऊन कुठेही शेतकऱ्यांच्या बाजूने कार्यवाही झाली नाही.
दुसऱ्या बाजूला खरेदी केंद्रात नाकारलेला सोयाबीन बाजार समितीमधील अडतदार किंवा व्यापारी कमी दरात मागायचे. त्याचे लिलावही होत नव्हते. नियमांच्या जाचामुळे शासकीय खरेदी केंद्रात फारशी सोयाबीन खरेदी झालीच नाही. शासनाला खरेदीच करायची नव्हती, म्हणून नियम लावून अडवणूक केल्याचा दावा शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील यांनी केला आहे.
सोयाबीनचे दर मागील पंधरवड्यापासून वाढायला सुरवात झाली. सद्यःस्थितीत दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरील आवकही कमी झाल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.