औरंगाबाद : कपाशीपाठोपाठ मराठवाड्यातील सोयाबीन या सर्वाधिक क्षेत्रावरील पिकाच्या उत्पादनातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात घट आली असतानाच हमीदराच्या आत असलेले सोयाबीनचे दरही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करीत असल्याची स्थिती आहे.
कृषी विभागाच्या लेखी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १७ लाख २१ हजार हेक्टरवर यंदाच्या खरिपात सोयाबीनची पेरणी झाली होती. सद्यस्थितीत या पिकाची काढणी व मळणीचे काम वेगात सुरू आहे. मागील दोन आठवड्यांत बरसलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या काढणी व मळणीच्या कामात व्यत्यय निर्माण केला. त्यामुळे या पिकाची काढणी लांबली.
केवळ काढणी लांबलीच नाही, तर पावसाच्या प्रदीर्घ खंडानंतर कसाबसा हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचा घास हिरावण्याचे काम परतीच्या पावसाने केले. शासनाच्या हमीदराने सोयाबीन खरेदी केंद्रावर आर्द्रतेची आडकाठी आडवी असली तरी काढणीला आलेले सोयाबीन भिजल्याने त्याची खरेदी निकषाच्या अधिन राहून होणे शक्यच नसल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे.
कृषी विभागाच्या लेखी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात ही घट आता खर्चालाही न परवडण्यापर्यंत जाऊन पोचल्याची स्थिती आहे. दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनची वाढ झाली; परंतु त्याला शेंगाच लागल्या नसल्याचा प्रकार समोर आला होता.
नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने काहीअंशी सोयाबीनची स्थिती सुधारल्याचा दावा केला गेला. सोबतच या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट येण्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात या जिल्ह्यांमध्येही उत्पादनात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे यंदा मोठी घट आल्याचे शेतकरी सांगताहेत.
दर कंबरडे मोडणारे
मराठवाड्यातील सर्वच भागात सोयाबीनला १८०० ते २८०० च्या आसपासच दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. जे सोयाबीन पावसामुळे भिजल त्याला तर १८०० वा त्यापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सोयाबीनचे ‘बरे’ उत्पादन झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते भिजल्याने त्याला अपेक्षित दर मिळण्यापासून शेतकरी वंचित राहिल्याचे चित्र आहे.