सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा

मी सोयाबीन पीक लागवडीसाठी दीड एकर क्षेत्र ठेवले आहे. मात्र, सध्या बाजारात मला बियाणे मिळत नाही. यामुळे शेत तयार असून पेरणीच्या कामांचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. - विकास कदम, कोपर्डे, जि. सातारा.
सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा
सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा

सातारा ः खरीप हंगामात सर्वाधिक लागवड होणाऱ्या सोयाबीन पिकाच्या बियाण्याचा सध्या तुटवडा जाणवू लागला आहे. या हंगामासाठी मुबलक बियाणे उपलब्ध केले असल्याचा कृषी विभागाच्या दावा फोल ठरला आहे. सोयाबीन बियाण्यासाठी जिल्ह्यात शोधाशोध करावी लागत असल्याने याचा परिणाम सोयाबीन पेरणी क्षेत्रावर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीस वेग आला असून, मागील सप्ताहापर्यंत ३० टक्के पेरणीची कामे उरकली आहेत. सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, मका, भात आदी पिकांच्या पेरण्या झाल्या आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र टप्पाटप्याने वाढत आहे. आज मितीला खरिपात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे झाले आहे. याही हंगामात सोयाबीन पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.

जिल्ह्यात खरिपाचे तीन लाख हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ५३ हजार हेक्‍टर आहे. या क्षेत्रासाठी कृषी विभागाकडून १७ हजार १९९ क्विंटल मागणी करण्यात आली होती. यापैकी १२ हजार ८४६ क्विंटल बियाण्याची उपलब्धतता झाली आहे. उपलब्ध बियाण्यातून १० हजार ७१० क्विंटल बियाण्याची विक्री करण्यात झाली असून, दोन हजार १५४ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. मागील सप्ताहातपर्यंत २४ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अजून जिल्ह्यात ५० टक्‍क्‍यांवर सोयाबीनचे क्षेत्र शिल्लक असतानाच बियाणाचा तुटवडा भासू लागला आहे.

मागील दोन ते तीन हंगामाचा अनुभव पाहता सर्वसाधरण क्षेत्रापेक्षाही अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळे कृषी विभागाकडून बियाण्याची मागणी वाढविणे गरजेचे आहे. सध्या सोयाबीन बियाण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांच्या हेलपाटे सुरू झाले असून, बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दसरा, दिवाळी सणासाठी पैसे देणारे पीक तसेच बिवड फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन घेण्याचा कल वाढत आहे.

मागील हंगामात सोयाबीनच्या दरातबाबत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असले, तरी सध्यातरी सोयाबीनला पर्याय दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून या पिकालाच प्राधान्य देत आहेत. यामुळे सोयाबीन बियाणे तातडीने उपलब्ध व्हावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

जिल्ह्यात ५३ हजार हेक्‍टरवर सोयाबीन पेरणी होते. या हंगामात तुलनेत क्षेत्र वाढण्यासाठी शक्‍यता आहे. १७ हजार १९९ क्विंटलपैकी १२ हजार ८६४ क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारपेठेत उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत चार हजार २५५ क्विंटल कमी बियाणे आवक झाली आहे. परिणामी, तुटवडा भासू लागला आहे. ग्रामीण भागात सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने शेतकरी शहरातील कृषी सेवा केंद्रांवर येत आहेत. मात्र, तिथे परिस्थिती तशीच असल्याने आर्थिक नुकसान होण्याबरोबच वेळ वाया जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com