सोलापूर : सहकार क्षेत्राची अवस्था बदलायची असेल तर सहकार क्षेत्रात अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आयोजित राज्यतस्तरीय पणन व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
सोलापुरात नुकतीच ही कार्यशाळा झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू. एस. इंदलकर, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, अटल महापणन विकास अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) यांच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन सहकारमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘व्यापाराचे अर्थकारण बदलल्यामुळे सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध विकास सोसायट्या तसेच बाजार समित्यांसमोर आव्हाने आहेत. त्यांना टिकावयाचे असेल तर त्यांनी मार्केटिंग व ब्रॅंडिंग करून वेगवेगळे प्रक्रिया उद्योग सुरू करून आर्थिक परिस्थिती सुधारावी लागेल. त्यांनी विविध महिला बचत गटांच्या माध्यमातील उद्योगांना एक बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचाही या माध्यमातून आर्थिक विकास करणे गरजेचे आहे. राज्य शासन विविध संस्थांचे संगोपन व बळकटीकरण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.’’