‘स्टार्टअप’च्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उद्योजक

‘स्टार्टअप’च्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उद्योजक
‘स्टार्टअप’च्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उद्योजक

मुंबई : स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, तसेच नवनवीन संकल्पनांवर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी येथे सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह-२०१८चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. २५) सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री पाटील-निलंगेकर पुढे म्हणाले, की नवीन संकल्पना व तंत्रज्ञानावर उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या सप्ताहाअंतर्गत नावीन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. स्टार्टअपअंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्टअप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवउद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात २५ ते ३१ मेपर्यंत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील १०० व्यवस्थापन/उद्योजक यांची निवड करून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक्ष क्षेत्रातील तीन असे एकूण २४ नवीन उद्योजकांची निवड करून त्यांना १५ लाखांपर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना (स्टार्टअप) शासकीय यंत्रणेशी संपर्क व सहयोग पुढील १२ महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.

परदेशात व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वरील २४ उद्योजकांव्यतिरिक्त पाच ते दहा नवीन उद्योजकांना १५ लाखांपर्यंत आर्थिक साह्य परदेशात बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी ‘स्टार्टअप धोरण’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले, तसेच महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि टाटा ट्रस्ट फाउंडेशन यांच्यामध्ये स्टार्टअपसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन, व्हीएसटीएफच्या संचालिका श्वेता शालीन, टाटा ट्रस्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार आदी उपस्थित होते.

नवीन उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट स्टार्टअपचे हे धोरण इतर राज्यांच्या धोरणापेक्षा व्यापक व उपयुक्त ठरणार आहे. नवीन उद्योजकांसाठी (स्टार्टअप) शासनाबरोबर काम करण्याची थेट संधी मिळणार आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून नवीन उद्योजक तयार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पाच नवीन उद्योजक निवडून त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल. नवीन उद्योजक तयार करण्याबरोबरच रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री. पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com