नगर ः पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारसह १६ गावांतील पाणीयोजनेचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजजोडणी तोडली होती. या संदर्भात नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर कान्हूर पठार व तेथील वाड्या-वस्त्यांसाठी दोन टॅंकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या उन्हाळ्यात शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने ४३ टॅंकर मंजूर केले आहेत.
जिल्ह्यात गत पावसाळ्यात झालेला दमदार पाऊस व मागील दोन वर्षांत झालेली ‘जलयुक्त शिवार’ची कामे, यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी जाणवली.
कान्हूर पठारसह १६ गावांतील पाणीयोजनेची वीजबिले थकीत राहिल्याने महावितरणने या गावांतील पाणीपुरवठ्याचा वीजजोड तोडला आहे. वीजबिल भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नसल्याची भूमिका महावितरण प्रशासनाने घेतली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे आदींसमवेत गुरुवारी (ता. ३) बैठक घेतली. या गावात टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एमजीपी प्रमाणपत्र व अन्य बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या. त्यानुसार सर्व बाबींची पूर्तता झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कान्हूर पठार व त्याच्या वाड्यांतील चार हजार ३०० लोकसंख्येसाठी दोन टॅंकर मंजूर केले आहेत.
गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने संगमनेर, अकोले, नगर व पारनेर तालुक्यांतील १४ गावे व १०० वाड्यांसाठी ३४ टॅंकर मंजूर केले होते. शुक्रवारी (ता. ४) जिल्हा प्रशासनाने नऊ टॅंकरना मंजुरी दिल्यामुळे आता जिल्ह्यात ४३ टॅंकर मंजूर झाले आहेत. शुक्रवारी मंजूर झालेले नऊही टॅंकर पारनेर तालुक्यातील आहेत. सध्या जिल्हाभरात १६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.