सातारा : पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावूनही जिल्ह्यातील अनेक भागातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात टॅंकरच्या संख्येत १३ ने वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे ४९ गावे १२६ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत आहे. मागील पंधरवड्यात टॅंकरची संख्या २९ होती ती आता ४२ वर गेली आहे. सध्या जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण व जावली तालुक्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहेत. या तालुक्यात १० टॅंकरद्वारे १४ गावे आणि ८० वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. जावली तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
खटाव तालुक्यातील सहा टॅंकरने आठ गावे २८ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील सात गावांना सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यात एका गावाला एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
वाई तालुक्यातील दोन गावे, एका वाडीवस्तीला दोन टॅंकरद्वारे, पाटण तालुक्यातील एक गाव चार वाड्यावस्त्यांना दोन टॅंकरद्वारे, तर महाबळेश्वर तालुक्यातील सात गावे व तीन वाड्यावस्त्यांना तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ४, खटावमधील १, कोरेगावमधील ४, फलटणमधील ५, वाईमधील ७, जावलीमधील सात, महाबळेश्वरमधील ७ विहिरींचा समावेश आहे.