वाळवा, जि. सांगली : साखर कारखान्यांसाठी ७०-३० चा फॉर्म्युला स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. नफ्यातला हिस्सा शेतकऱ्याला गेला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. कारखान्यांनी ‘एफआरपी' पूर्ण द्यावी; त्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांचे हित जपणारे एकमेव आमचे सरकार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.२५) झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार पतंगराव कदम, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘वाळवा ही क्रांतिकारकांची भूमी आहे. क्रांतिभूमीत क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या अस्थीचे दर्शन घेण्याची मला प्रथमच संधी मिळाली. अण्णांच्या समाधी दर्शनातून मला आणखी उचित काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’’
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की हुतात्मा कारखाना उत्कृष्टरीत्या सुरू आहे. कोणतेही उपपदार्थ घेत नसलेला हा कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर देत आहे. राज्यातील कारखान्यान्यांनी याचा आदर्श घेतला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल.’’
वैभव नायकवडी म्हणाले, की पहिल्यापासूनच उसाला अधिक दर देण्याची आमची भूमिका होती, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना सर्वात अधिक दर देत आहे.