सातारा ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यातील सह्याद्री व कृष्णा या दोन कारखान्यांनी दुसरा हप्ता देत तीन हजारांचा टप्पा ओलंडला असून इतर कारखाने दुसरा हप्ता किती, कधी व एकरकमी देणार का, तीन हजारांचा टप्पा गाठणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
जिल्ह्यात २०१६-१७ मधील गळीत हंगामात १५ साखर कारखान्यांनी ५४ लाख ३१ हजार १५७ टन उसाचे गाळप करून ६५ लाख १६ हजार १८६ क्विंटल साखर उत्पादित केली. सर्वच कारखान्यांनी एफआरपीनुसार पहिला हप्ता दिला. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला होता. जुलै, ऑगस्टमध्ये साखरेच्या किमतीत चांगली वाढ होऊन दर ३९०० ते ४००० रुपये क्विंटल दरम्यान गेले होते. यामुळे साहजिकच उसाला दुसरा हप्ता जास्त मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. या दरम्यानच सह्याद्री साखर कारखान्याने दुसऱ्या हप्ताची कोंडी फोडत ४३० रुपये प्रतिटन असा विक्रमी हप्ता जाहीर केला.
या कारखान्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांचा फरक ठेवला आहे. यानंतर कृष्णा कारखान्यानेही दुसरा हप्ता ३०० रुपये जाहीर करून प्रतिटनास ३१०० रुपये दर दिला आहे; मात्र या कारखान्याने दुसऱ्या हप्ताचे दोन टप्पे केले आहेत. तसेच फलटण तालुक्यातील शरयु आणि लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर या कारखान्यांनी बेंदराच्या सणासाठी टनास ५० रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला होता. हे अपवाद वगळता इतर कारखान्यांकडून अजून दुसरा हप्ता जाहीर करण्यात आलेला नाही. या काळात इतर कारखाने दुसरा हप्ता देतील अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असतानाही कारखान्यांकडून काहीच हालचाल झाली नव्हती.
आगामी गाळप हंगामाची अनेक कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला आहे. या सणाच्या तोंडावर दुसरा हप्ता मिळेल, असा शेतकऱ्यांना अंदाज असताना कारखान्यांकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.