जळगाव ः साडेचार पाच हजार हेक्टरपर्यंत राहणारे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र यंदा वाढत आहे. मागील चार महिने यावल, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर भागात ऊस लागवड बऱ्यापैकी झाली असून, वाढत्या साखर कारखानदारीमुळे ऊस शिल्लक राहणार नाही, अशी हमी शेतकऱ्यांना दिसू लागली आहे. उसाचे क्षेत्र आठ हजार हेक्टरवरून १३ हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे. त्यात आणखी काहीशी वाढ होईल.
केळीचे पीकही अधिक खर्चिक बनले आहे. त्याला एकरी एक लाख रुपयांपर्यंत (उतिसंवर्धित रोपे व फ्रूट केअर तंत्रज्ञान) खर्च येतो. कापसाची स्थिती मागील दोन वर्षे बिकट बनली आहे. पुढील कापूस हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कारण गुलाबी बोंड अळीचे संकट कायम आहे.
अशातच जिल्ह्यात पूर्वहंगामी (सप्टेंबर) ऊस लागवड सुरू झाली. चोपडा, यावल, चाळीसगाव भागात ही लागवड सुरू होती. सुरू ऊस लागवड नोव्हेंबरपासून सुरू आहे. या महिन्यातही रावेर, चाळीसगाव भागात सुरू ऊस लागवड होईल. सर्वाधिक साडेचार हजार हेक्टर ऊस लागवड यावलमध्ये झाली आहे. यापाठोपाठ चोपडा तालुक्यात सुमारे साडेतीन हजार, रावेरमध्ये तीन हजार, चाळीसगावात सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस लागवड आहे. चाळीसगावात ऊस लागवड सध्या सुरू आहे.
गिरणा काठ व निर्माणाधीन वरखेडे लोंढे बॅरेज परिसरात ऊस लागवड आहे. आणखी एक ते दीड हजार हेक्टरवर ऊस लागवड होईल; परंतु आडसाली (जूनमध्ये लागवडीची) ऊस नसणार असे सांगण्यात आले.
कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीत. केळी पिकाचे गारपीट व वादळात नुकसान होण्याची भीती असते. तसेच केळीला वाहतूक खर्च लागतो. उसाला मात्र लागवड व तण नियंत्रण यानंतर फारसा खर्च नाही. विद्राव्य खते व इतर विषयही उसाबाबत नाहीत. त्यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल अधिक आहे.
उसाला सध्या नांगरणी व शेत भुसभुशीत करायला अडीच हजार रुपये लागतात. ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे व इतर कार्यवाहीसाठी एकरी दीड हजार रुपये, पाच हजार रुपये बेण्याचा खर्च, प्रतिटन सुमारे ५०० रुपये (स्थानिक भागात बेणे असल्यास) बेणे वाहतूक खर्च, अडीच हजार रुपये लागवडीचा खर्च लागत आहे, तर तीन वेळा तण नियंत्रण करावे लागते. खतांवर शेवटपर्यंत एकरी पाच हजार रुपये खर्च लागतो. हा खर्च कापूस व केळीच्या तुलनेत कमी असल्याचे ऊस उत्पादक एस. बी. पाटील (गणपूर, ता. चोपडा) यांनी सांगितले.