सातारा जिल्ह्यात ऊस पाचट व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी पाचट व्यवस्थापन ही काळाजी गरज आहे. पाचट व्यवस्थानामुळे सेंद्रिय कर्बात वाढ, भांडवली खर्च व पाण्याची मोठी बचत होते. - अंकुश सोनावले, कृषी सहायक, नागठाणे.
ऊस पाचट व्यवस्थापन
ऊस पाचट व्यवस्थापन
सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पाचटापासून शेतजमिनीची सुपीकता तसेच उत्पादनवाढीत होत असलेला फायदा याकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत. याही गाळप हंगामात ७० टक्के क्षेत्रावरील पाचट जाळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्‍यांत उसाचे पीक घेतले जात आहे. दरातील वाढलेली शाश्वतता आणि पाण्याची उपलब्धतता यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यामुळे साखर कारखान्यांची संख्याही वाढली आहे.
 
२०१७-१८ मधील गाळपासाठी जिल्ह्यात ८० हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. यामध्ये ६० हजार हेक्‍टर आडसाली, पूर्व व सुरू हंगामातील उसाचा समावेश आहे. हा ऊस जवळपास संपत आला आहे. सध्या खोडवा व उशिरा लागवड झालेल्या ऊसतोडणी व गाळपाचे काम सुरू आहे. आडसाली, पूर्व व सुरू हंगामातील तोडणी उरकली असून, यातील पाचट व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन सुपिकतेचे नुकसान होत आहे.
 
जिल्ह्यात २५ ते ३० टक्के शेतकरी पाचट व्यवस्थापनाद्वारे जमिनीची सुपीकता; तसेच उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांचा पाचट ठेवण्याबाबत गैरसमज असल्यामुळे पाचट ठेवली जात नसल्याचे दिसून येते. उंदीर प्रादुर्भाव आणि पाणी देताना अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगतात.
 
एक एकर ऊस क्षेत्रातील पाचट व्यवस्थापनातून सुमारे साडेचार टन सेंद्रिय घटक मिळत असते. याबरोबरच तणनियंत्रण, पाण्याची बचत; तसेच कमी प्रमाणात रासायनिक खते एकूणच भांडवली खर्चात बचत होते. सध्या जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार क्षेत्रावरील पाचट जाळल्याने दीड ते दोन लाख टन सेंद्रिय घटकांचा ऱ्हास होत आहे.      
 
जिल्ह्यात सध्या १५ साखर कारखाने आहेत. पुढील हंगामात ही संख्या १७वर जाण्याची शक्‍यता आहे. नवीन लागवड झालेला ऊस व खोडवा ऊस याच कारखान्यांकडून गाळप केला जाणार आहे. उसाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी पाचट व्यवस्थापनाकरिता सर्व कारखान्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापन करावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर काही मदत करता येईल, अशा प्रकारची योजना तयार करण्याची गरज आहे. साखर कारखान्यांबरोबरच कृषी विभागाने जनजागृतीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com