कोल्हापूर : ऊसदरावर तोडगा निघाल्याने जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामास सुरवात झाली आहे. शिरोळ तालुक्यात काही संघटनांनी केलेले आंदोलन वगळता ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. मंगळवारपर्यंत (ता.८) जिल्ह्यातील ९ कारखान्यांनी हंगाम सुरू केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
शासकीय आदेशानुसार हंगामास आठवड्याचा विलंब झाला आहे; पण पावसामुळे वाफसा हळूहळू येत असल्याने याचे फारसे नुकसान यंदाच्या हंगामात झाले नाही. शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या दोन दिवसांत गळीत हंगामास प्रारंभ केला; पण कोणत्याही कारखान्याने दर जाहीर न करता बैठकीतील निर्णयापणे दर देण्याची घोषणा केली.
गडहिंग्लज भागात कमी दर मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या कारखान्यांना ऊस देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिरोळ व हातकणंगले तालुक्याच्या काही भागात आंदोलन अंकुश व सकल ऊसकरी परिषदेने जादा ऊस दाराची मागणी करत काही गावात ऊसतोडी रोखल्या आहेत. यामुळे या भागातील कारखान्यांच्या तोडी काहीशा संथ पद्धतीने सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.
यंदा कर्नाटकमधील कारखान्यांनी लवकर गाळप सुरू करून सीमा भागातील २ ते २.५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप सुरू केले आहे. महाराष्ट्रतील कारखान्यांपेक्षा या कारखान्यांनी दर जादा देऊन ऊस उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे सीमा भागावर असणाऱ्या महाराष्ट्रमधील अनेक कारखान्यांना कर्नाटकमधील कारखान्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.