सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुरांडे पेटू लागली आहेत. काही कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहेत; मात्र यंदाच्या गळीत हंगामातील कोणता कारखाना किती दर देणार याबाबत अद्यापही चर्चा झालेली नाही. त्यामुळे दराची कोंडी फुटलेली नाही. त्यामुळे पहिली उचल किती मिळणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यात १६ साखर कारखाने आहे. त्यातील बहुतांश कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उसाला पहिली उचल ३४०० रुपये मागितली आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांनीही उसाला पहिली उचल ३४०० रुपये मागितली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये दराची मागणी केली आहे, तर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे ४४५० रुपयांची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी उसाला पहिली उचल किती देणार यावरून बैठका घेण्यात आल्या होत्या. त्याबैठकांमध्ये उसाला पहिली कोंडी फोडली होती. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील कोणत्याच कारखान्यांनी पहिली उचल काय देणार याबाबत घोषणा केलेली नाही. कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करण्यासाठी काही भागात उसतोडी बंद केल्या आहेत; मात्र तरीही कारखानदार याबाबत शांतच आहेत. कारखाने आणि आंदोलन शेतकरी संघटना यांच्यात दरांसाठी बैठका घ्यावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
उद्याच्या बैठकीकडे लक्ष
कर्नाटकातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी शासकीय पातळीवर गुरुवारी (ता.२) नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत काय ठरणार याकडे शेतकरी, कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे.