जळगाव : खानदेशात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे. त्यात खासगी व सहकारी कारखानदारांमध्ये गाळपासाठी ऊस मिळविण्याची स्पर्धा सुरू असून, खासगी कारखानदारांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे.
आदिवासी सहकारी साखर कारखाना (डोकारे, ता. नवापूर, जि. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, चहार्डी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना आणि न्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील सहकारी साखर कारखाने सुरू झाले आहेत. चोपडा कारखान्यात औपचारिकता म्हणून बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला; पण प्रत्यक्ष गाळप अजून सुरू झालेले नाही.
खानदेशात मिळून दोनच खासगी कारखाने सुरू आहेत; पण खानदेशच्या सीमेलगत गुजरात व नाशिकमधील खासगी कारखानेही नंदुरबार, चोपडामधील उसावर ‘डोळा’ ठेवून आहेत. चोपडा, मधुकर सहकारी साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेले नाहीत. सातपुडा व आदिवासी सहकारी साखर कारखान्याने दर जाहीर केले आहेत. २१०० पहिली उचल आणि नंतर ३०० रुपये असे दर दोन सहकारी साखर कारखान्यांनी जाहीर केले आहेत.
असेच दर नाशिक व गुजरातमधील खासगी साखर कारखान्यांनी देऊ केले आहेत. चोपडा येथे खासगी साखर कारखान्यांची चार कार्यालये सुरू आहेत. या कारखान्यांचे मजूर दिवाळीनंतर दाखल झाले. नाशिक, गुजरातमध्ये चोपडा, शिरपूर, शहादा, तळोदा, नंदुरबार येथून मोठ्या प्रमाणात ऊस जात आहे. स्पर्धा वाढल्याने कोणत्याच शेतकऱ्यांचा ऊस तोडणीविना राहणार नाही, असे चित्र यंदा निर्माण झाले आहे.