कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर हंगाम एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. पश्चिम भागातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला असून, या कारखान्यांचे मजूर परतत आहेत. पूर्वेकडील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कारखाने एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील अशी शक्यता आहे.
साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के गाळप हंगाम संपला आहे. ज्या कारखान्यांचे ऊस क्षेत्र जास्त आहे. तेच कारखाने अद्याप सुरू आहे. हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांपैकी ८० टक्के कारखान्यांचा गळीत हंगाम संपलेला आहे. बहुतांशी कारखाने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील अशी शक्यता आहे. मार्चच्या चौथ्या सप्ताहाअखेर २२ पैकी १८ कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे.
यंदाच्या ऊसतोडणीसाठी वाढते ऊन मुख्य अडसर ठरत असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बहुतांशी मजूर गावाकडे परतत आहेत. यामुळे जे कारखाने सुरू आहेत. त्या कामगारांनाही परतीचे वेध लागले आहेत. परंतु नियोजनापेक्षा पन्नास टक्के उसतोडणी मजूर कमी आल्याने त्याचा ताण सध्या सुरू असणाऱ्या साखर कारखान्यांना सहन करावा आहे.
ज्या गावांमध्ये उस शिल्लक आहेत. त्या गावात ऊसतोडणी कामगार जाण्यास नकार देत आहेत. अनेक ठिकाणी नियोजित टोळ्या न आल्याने संबधित भागातील ऊसतोडणी शिल्लक आहे. ही तोडणी वेळेत करण्याकरिता एका गावाहून दुसऱ्या गावात ऊसतोडणी कामगारांना हलविणे गरजेचे आहे. परंतु कामगार याला नकार देत असल्याने शिल्लक ऊसतोडणीसाठी कारखाना प्रतिनिधींची धावपळ चालली असल्याचे दृश्य ऊस शिवारात दिसते.
अनेक कारखाने तोडणी यंत्रणा अपुरी असल्याने लवकर बंद झाले. या कारखान्यांचा ऊस शिल्लक आहे. हा ऊस नेण्यासाठीही शेतकऱ्यांची कारखान्यांकडे विनवणी सुरू आहे. परंतु हे प्रमाण कमी असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. येत्या आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील नोंदणी केलेला सर्व ऊस गाळपास जाईल, त्यामुळे शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे कारखानादार सूत्रांनी सांगितले.