कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला

ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. जिल्ह्यात या हंगामाअखेर १३२ लाख ९८ हजार २६८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून १२.५६ टक्के उताऱ्याच्या सरासरीने १६७ लाख १ हजार १४७ क्विंटल साखर उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा विक्रम यंदा शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने केला आहे . ‘दत्त शिरोळ’ने ११ लाख ८७ हजार २१ टन उसाचे गाळप केले. १२. ५५ टक्के सरासरी उताऱ्याने १४ लाख ९० हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. त्यापाठोपाठ तात्यासाहेब कोरे, वारणा आणि कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यानी ऊस गाळपात आघाडी घेतली. 
 
साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे यंदाही खासगी साखर कारखान्यांनी बाजी मारली आहे. दत्त दालमिया शुगरने जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १३.२८ टक्के साखर उतारा मिळवला. गुरुदत्त शुगरने १३.२२ टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. 
 
सहकारी साखर कारखान्यांमध्ये साखर उताऱ्यात देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली. या कारखान्याने १३.०५ टक्के साखर उतारा मिळवला असल्याचे कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

यंदा ऊसतोडणी कामगार जास्त न आल्याने उपलब्ध ऊस तोडणीसाठी कारखानदारांची मोठी धावपळ उडाली. शेवटच्या पंधरा दिवसांत तर जेथून मिळतील तेथून मजूर, वाहतूकदार आणून कारखान्यांनी नोंद असलेला ऊस तोडणी केला. इतर कारखान्यांचा शिल्लक असलेला ऊस ही काही मोठ्या कारखान्यांनी गाळप केल्याने यंदा जिल्ह्याच्या शिवारात तोडणीविना ऊस शिल्लक राहिला नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com