औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग नोंदविला. दरदिवशी सरासरी ८७ हजार २०० टन उसाचे गाळप करण्याची क्षमता असलेल्या या कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ८४ लाख ९७ हजार ५४५ टन उसाचे गाळप केले असून, ८४ लाख ६८ हजार ९०४ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के राहिला.
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. यामध्ये चार खासगी व एका सहकारी कारखान्याचा समावेश होता. पाचही कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार २२६.५१ टन उसाचे गाळप करून १४ लाख ३५ हजार २२७ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. पाचही कारखान्यांचा साखर उतारा ९.९५ टक्के राहिला.
जालना जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी अशा पाच कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला. पाचही कारखान्यांनी २१ लाख ५ हजार २५५ टन उसाचे गाळप करीत २१ लाख ४४ हजार ३४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.१९ टक्के राहिला.
बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदविला. यामध्ये पाच सहकारी तर दोन खासगी कारखान्यांचा समावेश होता. पाच कारखान्यांनी ३४ लाख ४४ हजार ६०० टन उसाचे गाळप करताना ३४ लाख २० हजार १६६ क्विंटल साखर उत्पादित केली. सातही कारखान्यांचा साखर उतारा ९.९३ टक्के राहिला.
नंदूरबार जिल्ह्यातील २ सहकारी व एका खासगी कारखान्याने गाळपात सहभाग नोंदविताना ११ लाख १८ हजार ३५१ टन उसाचे गाळप केले. यातून ११ लाख २३ हजार ७८० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तीनही साखर कारखान्यांचा साखर उतारा १०.०५ टक्के राहिला.
या तीनही कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन सहकारी व एका खासगी साखर कारखान्याने ऊस गाळपात सहभाग नोंदविला. ३ लाख ८६ हजार ११२ मेट्रिक टन उसाचे गाळप करताना तीनही कारखान्यांनी ३ लाख ४५ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
दोन ते तीन कारखान्यांची हंगाम स्थितीबाबतची माहिती संकलित करणे बाकी असले, तरी गाळपात सहभागी सर्व कारखान्यांची धुराडी जवळपास थंडावल्यात जमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.