औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ७७ लाख ६३ हजार १५.६४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. याद्वारे ७६ लाख १७ हजार ५८८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
आणखी जवळपास पंधरा दिवस ते महिनाभर विशेषतः मराठवाड्यातील कारखान्यांचा उस गाळप हंगाम चालण्याची शक्यता असून जवळपास ८० ते ८१ लाख टनांपर्यंत ऊस गाळप होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. त्यामध्ये औरंगाबाद व जालन्यातील प्रत्येकी पाच, बीडमधील सात तर जळगाव व नंदूरबारमधील प्रत्येकी तीन साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी ९ लाख ७२ हजार ९५६ टन उस गाळपातून ९ लाख ६२ हजार २२३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. नंदूरबारमधील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८९ टक्के राहिला.
जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३ लाख ८६ हजार ११२.६१ टन ऊस गाळपातून ३ लाख ४५ हजार २९० क्विंटल साखर उत्पादन घेतले. या तीनही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९४ टक्के राहिला.
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १३ लाख ९२ हजार १८० टन उसाचे गाळप केले. यातून १३ लाख ६९ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन झाले. या पाचही कारखान्यांचा साखर उतारा ९.८४ टक्के राहिला. जालना
जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १८ लाख ५१ टन उसाचे गाळप करताना १७ लाख ९६ हजार ३२५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जालना जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९८ टक्के राहिला.
बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी यंदा उसाच्या गाळपात सहभाग घेतला आहे. या कारखान्यांनी ३२ लाख ११ हजार ७१५ टन उसाचे गाळप करत ३१ लाख ४४ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या सातही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.७९ टक्के राहिला आहे.
खानदेश व मराठवाड्यातील जवळपास पाच कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.