औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ पैकी ११ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. २३ कारखान्यांनी आतापर्यंत ८३ लाख ३८ हजार ७५८ टन उसाचे गाळप करीत ८२ लाख ७८ हजार ८८६ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गाळप हंगाम सांगता झालेल्या साखर कारखान्यांमध्ये नंदुरबारमधील १, जळगावातील २, जालन्यातील ३ तर बीड जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी यंदा ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला होता. या सातही कारखान्यांनी ३४ लाख ३६ हजार ७८५ टन ऊस गाळप करून ३४ लाख ७ हजार ४६६ क्विंटल साखर उत्पादन केले. या सातही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्के राहिला. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदविला. यापैकी तीन कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली असून, पाच कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के राहिला. या कारखान्यांनी १९ लाख ८५ हजार ८२९ टन ऊस गाळपातून २० लाख ८ हजार ४७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अजूनही सुरूच आहे. या पाचही कारखान्यांनी आजवर १४ लाख ४० हजार ५९५ टन उसाचे गाळप करत १४ लाख २९ हजार ५०५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या पाचही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९२ टक्के राहिला.
जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३ लाख ८६ हजार ११२ टन ऊस गाळप केले. यातून ३ लाख ४५ हजार २९० क्विंटल साखर उत्पादन झाले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९४ टक्के राहिला. या तीन कारखान्यांपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, या तीन कारखान्यांनी आजवर १० लाख ८९ हजार ४३६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा ९.९९ टक्के राहिला, तर १० लाख ८८ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.