नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम
नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू केलेल्या ३२ पैकी २४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) सर्व ३२ साखर कारखान्यांनी १ कोटी १६ लाख ४५ हजार १७६ टन उसाचे गाळप केले. एकूण १ कोटी २३ लाख ८५ हजार १८१ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के आला आहे.
 
परभणी जिल्ह्यातील सर्व ५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १०, नांदेडमधील ४, हिंगोलीमधील ३ आणि लातूरमधील २ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांचे गाळप सुरू आहे.
 
यंदाच्या गाळप हंगामात परभणी जिल्ह्यातील सर्व ५ खासगी साखर कारखान्यांनी एकूण १७ लाख ७४ हजार ५८०.५५ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी १०.३१ टक्के उताऱ्याने १८ लाख ३० हजार १४१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११ टक्के आला आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ सहकारी साखर कारखान्यांनी ११ लाख २४ हजार ७५६ टन ऊस गाळप केला. या कारखान्यांचा सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा आला असून, १२ लाख १८ हजार ७५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. भाऊराव चव्हाण युनिट २ डोंगरकडा या कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.५३ टक्के आला आहे. पूर्णा युनिट २ (बाराशिव), पूर्णा सहकारी, टोकाई सहकारी या कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी एकूण १३ लाख ५६ हजार ५३९ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी १०.९० टक्के उताऱ्याने १४ लाख ७८ हजार १०१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.२५ टक्के आला आहे. भाऊराव चव्हाण युनिट ४, भाऊराव चव्हाण युनिट ३, शिवाजी सर्विस स्टेशन (जय शिवशंकर), कुंटुरकर शुगर्स या कारखान्याचे गाळप बंद झाले.
 
लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी एकूण ३५ लाख ३३ हजार ८२९ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.१८ टक्के आला असून, एकूण ३९ लाख ४९ हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.७१ टक्के आला आहे. प्रियदर्शनी आणि साईबाबा या दोन साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ७ खासगी, असे एकूण १० साखर कारखान्यांनी ३८ लाख ५५ हजार ४७१ टन ऊस गाळप केले असून, सरासरी साखर उतारा १०.१४ टक्के मिळाला आहे. या कारखान्यांनी एकूण ३९ लाख ८ हजार ८०४ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.१५ टक्के आला आहे. येथील सर्व कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
 
नांदेड विभागातील १४ सहकारी आणि १८ खासगी मिळून एकूण ३२ साखर कारखान्यांची सरासरी दैनंदिन ऊस गाळप क्षमता १ लाख १२ हजार ५० टन आहे. सोमवारपर्यंत (ता. १६) सर्व ३२ साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी १६ लाख ४५ हजार १७६ टन ऊस गाळप केले असून, १ कोटी २३ लाख ८५ हजार १८१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com