पुणे ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी आतापर्यंत ९४ लाख ६५ हजार ४९६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १०५ लाख २७ हजार ४७० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा सरासरी ११.१२ टक्के आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी एक लाख तीस हजार हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र असते. यंदा हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. आत्तापर्यंत ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यात एकूण १७ साखर कारखाने आहेत. यात सहकारी ११ तर खासगी ६ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता २५०० ते ८००० हजार टन एवढी आहे. सध्या कारखान्यांचा अर्ध्याहून अधिक गाळप हंगाम संपला असून, हा हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ६१ लाख ८ हजार ४३२ टन उसाचे गाळप केले आहे. ६७ लाख ३६ हजार ५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
त्यांचा साखर उतारा ११.३ टक्के आहे. खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ५७ हजार ६४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ३७ लाख ९१ हजार ४६५ क्विंटल साखर उत्पादन झाले असून, उतारा ११.२९ टक्के आहे.
जिल्ह्यात बारामती अॅग्रो साखर कारखान्याने सर्वाधिक नऊ लाख ३५ हजार २५० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून दहा लाख ५५ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या कारखान्याचा उतारा ११.२९ टक्के असल्याचे पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.