पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हळूहळू गाळप हंगाम बंद होण्यास सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होईल. साखर कारखाना स्थळावर रोजीरोटीसाठी आलेले ऊस तोड मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला होता. या हंगामात १८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखाने सुरू झाले होते. गेल्या पंधवड्यापासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होऊ लागला आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अधिक असल्या कारणाने उशिराने कारखाने बंद होत आहेत.
जिल्ह्यात सहकारी अकरा तर खासगी सहा असे एकूण सतरा साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत १११ लाख ७४ हजार २४२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी १२६ लाख ३६ हजार ४७० क्विटंल साखरेचे उत्पादन केले असून साखर उतारा ११.३१ टक्के एवढा आहे. यात सहकारी साखर कारखान्यांनी ७४ लाख ८ हजार ५९३ टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ८३ लाख ३४ हजार ९८० क्विटंल साखरेचे उत्पादन झाले. या कारखान्यांचा साखर उतारा ११.२५ टक्के आहे. खासगी कारखान्यांनी ३७ लाख ६५ हजार ६५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ४३ लाख १ हजार ४९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या कारखान्यांचा साखर उतारा ११.४२ टक्के आहे.
बंद झालेले साखर कारखाने
भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, विघ्नहर, भीमाशंकर, इंदापूर, निरा भीमा, अनुराज शुगर्स, बारामती अँग्रो, दौंड शुगर, व्यंकटेश कृपा शुगर.