सातारा ः जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली असून, उर्वरित नऊ साखर कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.८८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यात साखर उत्पादनाची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.
जिल्ह्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून श्रीराम, लोकनेते बाळासाहेब देसाई, रयत, न्यू फलटण, स्वराज्य या पाच कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
ऊस गाळपात सह्याद्री कारखान्याची आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक ११ लाख २५ हजार ४०० टन उसाचे गाळप केले असून, १३ लाख ९२ हजार ६८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून या कारखान्याचा उतारा १२.९१ टक्के आहे. सर्वांत कमी साखर उतारा ‘स्वराज’चा १०.१९ टक्के आहे.
जिल्ह्यात एकूण गाळपापैकी आठ सहकारी कारखान्यांनी ४५ लाख ८५ हजार ४५४ टन ऊस गाळपाद्वारे ५५ लाख ५१ हजार १८० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सहा खासगी कारखान्यांनी ३५ लाख ९१ हजार ५३३ टन ऊस गाळपाद्वारे ४१ लाख ६३ हजार ७७५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. उर्वरित कारखान्यांचा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. या हंगामात साखर निर्मितीची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने तसेच पाण्याची टंचाई भासू लागल्याने शेतकरी लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी साखर कारखाने तसेच चिठबॉय यांच्याकडे चकरा मारत आहेत. या शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा ऊसतोड मजुरांकडून घेतला जात आहे. एकर दोन ते पाच हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे केली जात आहे.