साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर उत्पादन

साखर उत्पादन
साखर उत्पादन

सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गाळप हंगामाची नुकतीच सांगता झाली. जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ८९ लाख ५७ हजार ९८९ टन उसाचे गाळप केले. त्यातून एक कोटी सात लाख ५२ हजार ३३० क्विंटल साखर उत्पादन झाले असून, सरासरी १२.०० टक्के उतारा मिळाला आहे. गाळप व साखर निर्मितीत ‘सह्याद्री’ने तर साखर उताऱ्यात व जयवंत शुगरने आघाडी कायम ठेवली.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊस गाळप केले. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने हा हंगाम मे महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहपर्यंत सुरू राहिला. या हंगामात सर्वाधिक सह्याद्री कारखान्याने १४ लाख ४४ हजार ११७  टन उसाचे गाळप केले असून, १८ लाख दोन हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले. साखर उताऱ्यात जयवंत शुगर कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा १२.९७ टक्के आला.

जिल्ह्यात खासगी कारखान्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या कारखान्यांकडून ऊस गाळपाचे प्रमाण वाढले आहे. सहा खासगी कारखान्यांनी ३७ लाख आठ हजार ६८८ टन उसाचे गाळप करीत ४३ लाख २६ हजार ८०५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे; तसेच आठ सहकारी कारखान्यांकडून ५२ लाख ४९ हजार ३०१ टन ऊस गाळप करून ६४ लाख २५ हजार ५२५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले होते. ऊसदरातील शाश्‍वतता वाढू लागल्याने जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उद्दिष्टे निश्‍चित ठेवत सर्वच कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. साधारणपणे चार ते पाच महिने हंगाम सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र, ऊस क्षेत्रातील वाढीमुळे सर्वच कारखान्यांचा अंदाज चुकला असून, प्रत्येक कारखान्याचा हंगाम १५ ते ४५ दिवस जास्त चालला आहे. यामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप जास्त झाल्याने कधी नव्हे ते एक कोटी क्विंटलपेक्षा जास्त साखरनिर्मिती झाली आहे. जिल्ह्यात ऊस हंगाम सुरळीत चालावा, यासाठी हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत एफआरपी व अधिक दोनशे हा फॉर्म्यूला मान्य करण्यात आला होता. मात्र, हंगामाच्या मध्यावर साखरेचे दर कमी होऊ लागल्याने पहिल्या हप्त्यातच कारखान्यांनी १०० ते ३०० रुपये कपात केली.

यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळा दर मिळाला आहे. साखरेच्या दरातील झालेली घसरण व ऊस शिल्लक राहील, या भीतीने शेतकऱ्यांनी किती बिल दिले जातेय, याकडे न बघता ऊस तुटण्यास प्राधान्य दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com