जळगाव : खानदेशात ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आहे; परंतु काही कारखान्यांचे गाळप आणखी महिनाभर चालणार आहे. न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला असून, या कारखान्याने यंदा दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
खानदेशात सहकारी तत्त्वावरील प्रमुख साखर कारखान्यांमध्ये ‘मधुकर’सह नंदुरबार येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना (डोकारे, ता. नवापूर), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना व चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
सहकारी साखर कारखान्यांमध्ये गाळपात सातपुडा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. चोपडा साखर कारखान्यातही सुमारे ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्याने यंदा ९४ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. ८.९० टक्के एवढा साखर उतारा मिळाला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये गाळपाला सुरवात झाली होती. इतर कारखानेही नोव्हेंबरमध्येच सुरू झाल्याची माहिती मिळाली.
मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार हजार हेक्टर उसाची नोंद होती. ऊसतोडणीला मजूर हवे तेवढे मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात करून खानदेशातील सहकारी साखर कारखान्यांनी गाळपात चांगली कामगिरी केल्याचे सांगण्यात आले. आदिवासी सहकारी साखर कारखाना हा नवापूर या आदिवासी शेतकरीबहुल भागात आहे. गुजरातमधील खासगी कारखानाचालकांशी चांगली स्पर्धा करून हा कारखानाही गाळपाबाबत चांगली कामगिरी करीत असल्याचे सांगण्यात आले.
खासगी कारखान्यांमध्ये अॅस्टीरीया शुगर (समशेरपूर, ता. नंदुरबार) व मुक्ताई साखर कारखाना (मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांचा समावेश असून, या कारखान्यांनीही गाळप चांगले करून ऊस उत्पादकांना दिलासा दिल्याची माहिती मिळाली.
शिरपूर साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांना मध्यंतरी आंदोलन करावे लागले. हा कारखाना सुरू करावा, अशी मागणी यंदा करण्यात आली असून हा सहकारी साखर कारखाना चांगले गाळप करू शकतो. सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील (कापडणे, ता. धुळे) यांनी मध्यंतरी केली होती.