सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात आला असून, लवकर ऊस तुटून जावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. प्रति एकर एक हजार ते पाच हजार रुपये तोडणीसाठी ऊस तोड मजुरांकडून मागितले जात आहेत. जिल्ह्यात १४ कारखान्यांकडून आतापर्यंत ६३ लाख ४० हजार १८६ टन उसाचे गाळप झाले असून, याव्दारे ७३ लाख ७० हजार ४६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
ऊस गाळप अंतिम टप्यात येऊ लागल्याने पाणीटंचाई, उसाचे वजन यावे, तसेच शेत लवकर मोकळे होण्याकरिता शेतकऱ्यांकडून ऊस लवकर तुटावा यासाठी धडपड सुरू आहे. याचा ऊसतोड मजुरांकडून फायदा घेतला जात आहे. एकरी एक हजार ते पाच हजार रुपये मागितले जात आहे.
या प्रकारची शेतकऱ्यांची लूट सुरू असतानाही साखर कारखान्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांना नाइलस्तव पैसे द्यावे लागत आहेत. अजून ऊस शिल्लक असल्याने एप्रिल महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गाळप हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ६३ लाख ४० हजार १८६ टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे ७३ लाख ७० हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ११.६२ टक्के उतारा मिळत आहे.
एकूण गाळपात आठ सहकारी कारखान्यांकडून ३५ लाख ४५ हजार ९३ टन ऊस गाळपाद्वारे ४२ लाख चार हजार ७०० क्विंटल, तर सहा खासगी कारखान्यांकडून २७ लाख ९५ हजार ९३ टन ऊस गाळपाद्वारे ३१ लाख ६५ हजार ७६० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. गाळपात ‘सह्याद्री’ने तर साखर उताऱ्यात ‘जयवंत शुगर’ने आघाडी घेतली आहे.