सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत चार सहकारी आणि सहा खासगी अशा दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित चार सहकारी कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून ८६ लाख ७७ हजार २०१ टन उसाचे गाळप करून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल (दहा हजार टन) साखरेची निर्मिती केली आहे. या वर्षी विक्रमी साखरनिर्मिती झाली आहे.
जिल्ह्यात एकूण १४ साखर कारखाने गेल्या पाच महिन्यांपासून (नोव्हेंबर) उसाचे गाळप करत आहेत. आतापर्यंत कारखान्यांनी ८६ लाख ७७ हजार २०१ टन उसाचे गाळप करून त्यातून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यामध्ये खासगी सहा कारखान्यांनी ३७ लाख ०६ हजार ५४९ टन उसाचे गाळप करून ४३ लाख २१ हजार ५५० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. या कारखान्यांना ११.६६ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
आठ सहकारी साखर कारखान्यांनी ४९ लाख ७० हजार ६५२ टन उसाचे गाळप करून ६० लाख ५५ हजार ८१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. या कारखान्यांना १२.१८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. आतापर्यंत श्रीराम फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई, रयत, खंडाळा तालुका, न्यू फलटण शुगर, जरंडेश्वर, जयवंत शुगर, स्वराज्य इंडिया, ग्रीन पॉवर आणि शरयू शुगर या दहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित सहा कारखान्यांचा हंगाम एप्रिलअखेर ते मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.