सातारा: जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस गाळप सुरू झाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आठ लाख ८८ हजार ८४८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे आठ लाख ७९ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगाम सुरू होऊन तीन आठवडे उलटले असले तरी अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही.
जिल्ह्यात नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्याने असून, एकूण १५ कारखान्यांपैकी बहुतांशी कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यात आठ लाख ८८ हजार ८४८ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून, त्याद्वारे आठ लाख ७९ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
गाळपात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक एक लाख ७६ हजार १०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, एक लाख ९७ हजार ४८० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखर उताऱ्यामध्ये जयवंत शुगर कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा ११.०४ टक्के आहे. हंगामाची सुरवात असल्याने जयवंत शुगरचा अपवाद वगळता अतर सर्वच कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांच्या आत येत आहे.
जिल्ह्यातील १५ पैकी अकरा कारखान्यांनी ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न मान्य केला आहे; मात्र फलटण तालुक्यातील तीन व कऱ्हाड तालुक्यातील एका कारखान्याने या पॅटर्नबाबतची भूमिक स्पष्ट केलेली नाही. अजिंक्यतारा कारखान्याने प्रतिटनास तीन हजार रुपये दर जाहीर करत दराची कोंडी फोडली आहे; मात्र हंगामास तीन आठवडे पूर्ण होऊनही इतर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली नाही.