पुणे : यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला कमी प्रमाणात पाऊस झाला. त्याचा परिणाम पुणे विभागातील ऊस लागवडीवर झाला आहे. सध्या विभागात पूर्वहंगामी ऊस लागवड सुरू आहेत. आत्तापर्यंत विभागात आडसाली, पूर्वहंगामी उसाची एक लाख ४९ हजार २९० हेक्टरवर लागवड झाली आहे; परंतु लागवडीचा वेग बघता चालू वर्षी कमी प्रमाणात लागवड झाली असून, पुढील वर्षी साखर कारखान्यांना गाळपासाठी लागणाऱ्या ऊस उपलब्धतेत कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात नगर, पुणे, सोलापूर हे जिल्हे उसाचे आगार म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांतील शेतकरी दरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आडसाली आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पूर्वहंगामी उसाची लागवड करतात. शेतकऱ्यांनी लागवड केलेला ऊस दुसऱ्या वर्षी साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होतो. चालू वर्षी जून आणि जुलैमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाने काहीशी चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहू लागली होती. त्यामुळे भूजलपातळीत चांगली वाढ होऊन विहिरींमधील साठा वाढला होता.
सुरवातीच्या अडीच महिन्यांत उसाच्या आगारात दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीऐवजी तूर, मूग, उडीद अशी पिके घेण्यावर भर दिला; मात्र नंतर झालेल्या पावसामुळे ऊस लागवडीला वेग येणे आवश्यक होते; परंतु अजूनही ऊस लागवडीला फारसा वेग आलेला दिसत नाही. आता पूर्वहंगामी ऊस लागवडीचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे चालू उसाच्या लागवडी शेतकऱ्यांना कराव्या लागणार आहेत.