पुणे : पुणे विभागात जून ते ऑगस्ट या कालावधीत पाऊस कमी प्रमाणात झाला. त्याचा परिणाम विभागातील ऊस लागवडीवर झाला आहे. आत्तापर्यंत विभागात आडसाली उसाची ५४ हजार ६८० हेक्टरवर लागवड झाली आहे. परंतु लागवडीची स्थिती बघता चालू वर्षी कमी प्रमाणात लागवड झाली असून पुढील वर्षी (२०१८-१९) साखर कारखान्यांना गाळपाकरिता ऊस उपलब्धतेत कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात नगर, पुणे, सोलापूर हे जिल्हे उसाचे आगार म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांत दरवर्षी जून ते जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड शेतकरी करतात. शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये लागवड केलेला ऊस दुसऱ्या वर्षी साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होतो.
चालू वर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली. १३ जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात अन्य ठिकाणी जोरदार पाऊस झाला नाही. त्यानंतर साधारणपणे २५ जुलैपर्यंत मराठवाडा वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस झाला.
ऑगस्टमध्येही पावसाने काहीशी चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली. परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहू लागली. पावसाळ्याच्या सुरवातीच्या अडीच महिन्यात उसाच्या आगारात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीऐवजी तूर, मूग, उडीद अशी पिके घेण्यावर भर दिला.
गेल्या अडीच महिन्यांत पडलेल्या पावसाचा खंडामुळे कमी कालवधीची पिकेही सुकली. मात्र, नंतर झालेल्या पावसामुळे ऊस लागवडीला वेग येण्याची आवश्यकता होती. परंतु फारसा वेग आलेला दिसत नाही. आता आडसाली ऊस लागवडीचा हंगाम संपला असून पूर्वहंगामी ऊस लागवडीस प्रारंभ होईल.