औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास साडेचार हजार हेक्टरने घटले आहे. या तीनही जिल्ह्यांत यंदा ६२०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरी, उन्हाळी मका, भुईमूग व इतर तृणधान्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत गतवर्षी १० हजार १२० हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. त्यातुलनेत यंदा आतापर्यंत ६२०३ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. या तीनही जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५६३० हेक्टर गृहीत होते. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जावून उन्हाळी पिकांची पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात गतवर्षी झालेल्या पेरणीच्या तुलनेत क्षेत्र जवळपास साडेचार हजार हेक्टरने घटले आहे.
यंदा पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १५६३, जालना जिल्ह्यातील ३६८ तर बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ४२७२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाणीसाठ्यांच्या बिकट अवस्थेचा थेट परिणाम रब्बीबरोबर उन्हाळी पेरणीवरही झाला आहे.
गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात ३८२९ हेक्टरवर उन्हाळी पिकाची पेरणी झाली होती. ती यंदा ही पेरणी गतवर्षीपेक्षाही निम्मे म्हणजे १५६३ हेक्टरवरच झाली आहे. जालना जिल्ह्यातही गतवर्षी ५१८ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. ती यंदा ३६८ हेक्टवरच अडकली आहे.
बीड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक उन्हाळी पेरणीचे क्षेत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात गतवर्षीच्या तुलनेत घटच दिसते आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात ५७७५ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा हे क्षेत्र केवळ ४२७२ हेक्टरवर पोचले आहे.
गतवर्षी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जवळपास १४ हेक्टरवर असलेले मुगाचे क्षेत्र यंदा कमी झाले. शिवाय बीड जिल्ह्यात उन्हाळी बाजरीचे जवळपास साडेतीन हजार हेक्टरवर असलेले क्षेत्रदेखील यंदा कमी झाले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात इतर तृणधान्यांची जवळपास १९२४ हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा केवळ ६० हेक्टरवर आली आहे.