सातारा ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत ४०.५७ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा सर्वाधिक क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पिकांची काढणीची कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र सुमारे ७४३६ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक ५२८० हेक्टरवर भुईमूग, तर उर्वरित क्षेत्रावर सूर्यफूल, मका व काही प्रमाणात चारा पिके घेतली जातात. पश्चिम भागातील तालुक्यांत पाण्याची उपलब्धतता असल्याने तेथील शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात.
सातारा, कऱ्हाड, जावली, पाटण, वाई, खंडाळा या तालुक्यांत भुईमुगाची, तर पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यांत सूर्यफूल, मका व चारा पिके घेतली जातात. सध्या पेरणीच्या कामांना वेग आला आला आहे. तसेच उसातही आंतरपीक म्हणून भुईमूग लागवड केली जाते. आतापर्यंत उन्हाळी पिकांची ३०१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात भुईमुगाची सर्वाधिक १९२६, मकाची १०९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
भाजीपाल्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या क्षेत्रात घट होऊन उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची बचत, कमी तण तसेच चांगले उत्पादन मिळावे या दृष्टीने भुईमूग पिकांसाठी काही शेतकरी ठिबक संच व मल्चिंग पेपरचा वापर करतात.
कृषी विभागाकडून उन्हाळी हंगामासाठी लागणारे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहेत. अनेक शेतकरी पावसाळ्याच्या सुरवातीस भुईमुगाच्या ओल्या शेंगा विकता याव्या, यासाठी मार्चच्या सुरवातीस भुईमुगाची पेरणी करतात. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी ज्वारीची काढणी व मळणीची कामे सुरू झालेली आहेत.
तालुकानिहाय पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः सातारा-२५२, पाटण-२२५, कऱ्हाड- ६६३, कोरेगाव- २१८, खटाव- ११६, माण- १०५, फलटण- ११७७, खंडाळा-११६, वाई- १४५.