जळगाव ः खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यांत उन्हाळ कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या सुरवातीला कांद्याचे दर चांगले असल्याने लागवडही वाढली, परंतु मागील पाच ते सहा दिवसांत दर कमी झाल्याने कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीती सतावू लागली आहे. खानदेशात लागवडीखालील क्षेत्र मिळून एक हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
खानदेशात कांदा लागवडीसाठी धुळे तालुका आघाडीवर असून, या तालुक्यातील कापडणे, न्याहळोद व इतर भागांत चांगली लागवड झाली आहे. तसेच शिरपूर, शिंदखेडा व साक्री भागांतही कमी अधिक अशी लागवड आहे. जळगाव जिल्ह्यात एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा आदी भागांत बऱ्यापैकी लागवड झाली आहे. ही लागवड वाढली असून,
यंदा जिल्ह्यात कांद्याचे सुमारे २७०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सुमारे ४०० हेक्टरने वाढ झाल्याचा अंदाज आहे.
जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळून सुमारे एक हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. धुळे जिल्ह्यातही सुमारे १५०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कांदा दर तेजीत होते. जानेवारीतही चांगले दर राहिले. ही बाब लक्षात घेता कांदा लागवड वाढली.
अनेक शेतकऱ्यांनी यंदा पाण्याची उपलब्धता लक्षात घेता सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब केला. तसेच गादीवाफ्यावर लागवड केली. त्यासाठी त्यांना यंदा खर्च अधिक आला, परंतु उत्पादन चांगले येईल व दर टिकून राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु दर कमी होत असून, जळगाव बाजारात सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. धुळे व चाळीसगाव बाजार समितीमध्येही सरासरी दर अपेक्षित नाहीत. आठ ते दहा दिवसांपूर्वी कांद्याचे सरासरी दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. परंतु ते कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
कांदा दर कमी झाल्याने खानदेशातील कांदा उत्पादक आता इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात कांदा नेत आहेत. तेथे दर बऱ्यापैकी मिळत असून, क्विंटलमागे वाहतूक खर्च धरून किमान १०० ते १५० रुपये अधिकचे मिळत असल्याचे सांगण्यात आले.