कोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतून रताळ्याची आवक वाढली आहे. रताळ्याची गेल्या चार दिवसांत दररोज एक ते दीड हजार पोती इतकी आवक होत आहे. रताळ्यास ७० ते २०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत रताळ्याचे दर सुमारे पंचवीस टक्क्यांनी वाढल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत रताळ्याची नियमित आवक ३०० ते ४०० पोती इतकी होत असते.
नवरात्रोत्सवानिमित्त रताळी मागणीत वाढ होत असल्याने शेतकरी काढणीचे नियोजन करतात. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे, भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरांतील शेतकरी रताळी पीक घेताना दिसतात. नवरात्रोत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.
कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे, कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असतात. याशिवाय पुणे-बेंगळूर महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर व परिसरांतील गावांतही रताळी पीक घेतले जाते.
खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. यंदा सुरवातीला पावसाने अडचण वाढविली असली, तरी रताळी काढणीच्या पक्वतेच्या काळात चांगला पाऊस झाल्याने त्यांची वाढ चांगली झाली. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नाची स्थिती चांगली राहिल्याचे उत्पादकांनी सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईच्या बाजारपेठांत या भागातील रताळ्यांना मागणी असते. यंदा मुंबई, पुण्याच्या बाजारपेठांतही दहा किलोस ३०० रुपयांपर्यंत दर मिळाले. सध्या कोल्हापूर बाजार समितीत नियमित आवक सुरू आहे. मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.